पीटीआय, पाटणा

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू आहे. सीबीआयने गुरुवारी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सीबीआयने मनीष कुमार आणि आशुतोष कुमार या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला नोटीस पाठवली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने (एनटीए) ५ मे रोजी वैद्याकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली. देशभरात सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, अनेक प्रकारच्या गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने ही परीक्षा वादग्रस्त ठरली आहे.

सीबीआयकडून मनीषला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याला अटक केली. दोघांना पाटणा येथे ताब्यात घेतले, असे अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. दोघांना पाटणा येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच त्यांची अधिक चौकशी करण्यासाठी सीबीआय आता न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी आहे, असे या अधिकाऱ्यांने सांगितले.

हेही वाचा >>>आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची टिप्पणी

मनीष कुमार आणि आशुतोष कुमार यांनी कथितरीत्या वैद्याकीय प्रवेश परीक्षा इच्छुकांना परीक्षेपूर्वी सुरक्षित राहण्याची व्यवस्था केली होती. ‘लर्न बॉईज हॉस्टेल आणि प्ले स्कूल’ भाड्याने घेतले होते. त्याठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिटने अर्धवट जळालेल्या प्रश्नपत्रिका जप्त केल्या होत्या. पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने कसून चौकशी सुरू केली आहे.

‘एटीए’च्या कार्यालयाला टाळे

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीप्रकरणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एटीए) च्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी एटीएच्या कार्यालयाला टाळेठोकले. यावेळी जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

८ जुलै रोजी सुनावणी

नीट प्रकरणानंतर आणखी एका याचिकेवरून एनटीएला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या याचिकेवरही ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि एसव्हीएन भाटी यांच्या सुट्टीतील खंडपीठाने, खासगी कोचिंग सेंटर आणि काही एनईईटी उमेदवारांनी दाखल केलेल्या नव्या याचिकेवर एनटीएला नोटीस बजावली आहे. ज्यावर न्यायालयाने आपल्या कोणत्या मूलभूत अधिकारांना धक्का बसला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर याचिकाकर्त्याने, विद्यार्थ्यांनी आमच्या क्लासच्या माध्यमातून अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकारांकडे लक्ष देणे आमचे काम आहे, असे म्हटले.

परीक्षेत ‘अभ्यासक्रमाबाहेर’चा प्रश्न?

प्रवेश परीक्षेत ‘अभ्यासक्रमाबाहेर’चा प्रश्न असल्याचा आरोप करणाऱ्या नीट उमेदवाराच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात सांगितले आहे. याचिकाकर्त्याने दावा केला की भौतिकशास्त्र विभागातील एक प्रश्न ‘रेडिओअॅक्टिव्हिटी’ वर आधारित होता. मात्र, ‘रेडिओअॅक्टिव्हिटी’ विषय हा यावर्षीच्या नीट-यूजी साठी अभ्यासक्रमाचा भाग नव्हता.