गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सनातन धर्म व त्यावरून चालू असणारं राजकारण चर्चेत आहे. तामिळनाडूचे मंत्री व स्टॅलिनपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या विधानामुळे हे राजकारण चालू झालं असलं, तरी आता ते पक्षीय पातळीवर गेलं आहे. या मुद्द्यावरून वेगवेगळे राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. योगगुरू बाबा रामदेव यांनी काशीमध्ये नुकत्याच केलेल्या एका विधानाचा संदर्भ घेऊन ठाकरे गटानं सनातन धर्मावरच्या राजकारणावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…त्यामुळे बाबा सत्यच बोलले असतील”

काशीमध्ये बोलताना बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानावर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. “प्रख्यात उद्योगपती, योगाचार्य बाबा रामदेव यांनी सांगितले की, जे सनातनला शिव्या देत आहेत, त्यांना २०२४ साली मोक्ष मिळेल. उद्योगपती रामदेव यांनी हे मोक्षपुराण काशी येथे सांगितले. काशी हे महातीर्थ आहे. विद्या आणि मोक्षाची नगरी आहे. काशी ही सत्यनगरीसुद्धा आहे. त्यामुळे बाबा सत्य बोलले असतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा नगरीत येऊन उद्योगपती रामदेव यांनी ‘मोक्ष’ देण्याच्या नव्या उद्योगाची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या पतंजली उद्योगसमूहास मोठीच बरकत येईल”, असा टोला रामदेव बाबांना लगावण्यात आला आहे.

“रामदेव यांनी ही ‘मोक्ष’ उद्योगाची घोषणा ‘इंडिया’ आघाडीस उद्देशून केली. तामीळनाडूत आज सनातन विरोधकांचे राज्य आहे व गेल्या काही दिवसांपासून ही मंडळी सनातन धर्मावर टीकाटिपणी करीत आहेत. जो धर्म तलवारीच्या धाकाने संपविता आला नाही तो धर्म शाब्दिक टीकेने अजिबात हतबल होणार नाही. पुन्हा त्याच तामीळ भूमीवर आज सनातन धर्माची पताका फडकत आहे. तेव्हा राजकीय विचार व धर्म यांची गल्लत करू नये”, असा सल्लाही ठाकरे गटानं भाजपाला उद्देशून दिला आहे.

“भाजपाला २०२४मध्ये पापनासम मंदिरात जावं लागेल”

“उद्योगपती रामदेव बाबा व भाजपाच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते आहे ती पोकळ तर आहेच, परंतु भंपकदेखील आहे. कारण त्यात राजकीय स्वार्थ व पेटवापेटवीशिवाय दुसरे काही नाही. ‘द्रविडी’ पक्ष सनातन धर्म मानत नाहीत हा त्यांचा राजकीय विचार आहे. तिरुनेलवेली येथे पापनासम मंदिर आहे. एखाद्याची पापे धुऊन काढायची तर येथे जायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना याच पापनासम मंदिरात जावे लागेल व त्या विधीचे पौरोहित्य उद्योगपती बाबा रामदेव यांना करावे लागेल”, असा टोला रामदेव बाबांना लगावण्यात आला आहे.

“एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या, तुमच्या प्रत्येक…”, भाजपा आमदाराचा श्रीकांत शिंदेंना …

“रामदेव बाबांचा हा उद्योग कोसळून पडेल”

“हृदयविकारावर रामबाण औषध रामदेव बाबांनी शोधले, पण बाबांच्याच पतंजलीचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांना हृदयविकाराचा झटका येताच प्राण वाचविण्यासाठी त्यांना दिल्लीतील इस्पितळात दाखल करावे लागले. आता रामदेव बाबांनी ‘मोक्ष’प्राप्तीकडे मोर्चा वळवला. या मोक्ष उद्योगाचे ‘पेटंट’ पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिले असेल तर २०२४ साली हा ‘मोक्ष’ उद्योग साफ कोसळून पडणार आहे”, असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slams ramdev baba on moksha statement in kashi sanatan dharma pmw