पश्चिम बंगालबाबत भाजपाच्या नेत्यांना चिंता वाटते. चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत. केंद्रीय बळ वापरूनही, दंगली पेटवूनही भाजपाचा पराभव होतो, हे पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकांनी दाखवून दिले. भाजपाची खरी चिंता हीच आहे. लोक शहाणपणाने वागले तर हुकूमशाहीचा पराभव सहज होतो. पश्चिम बंगालात ते दिसले. ममता बॅनर्जी बंगालचे युद्ध जिंकल्या, असे शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’त म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“साधारण ७४ हजार पंचायतींसाठी निवडणुका झाल्या. भाजप, तृणमूलमध्ये लढत झाली व या निवडणुका एखाद्या युद्धाप्रमाणे लढल्या गेल्या. या युद्धात ४० जणांचा मृत्यू झाला. अनेक मतदान केंद्रांवर हिंसाचार, रक्तपात, जाळपोळ, बुथ लुटण्यासारखे प्रकार घडले. पण ग्रामपंचायतींच्या ३५ हजार जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने जिंकल्या. भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपने ९७२२ ग्रामपंचायती जिंकल्या. तथापि, एकाही जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलले नाही,” असा टोलाही ठाकरे गटाने भाजपाला लगावला आहे.

हेही वाचा : “आम्ही जर बोललो तर पळता भुई थोडी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

“पश्चिम बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजपा…”

“पश्चिम बंगालमधील हिंसाचार निषेधार्ह आहे, मग मणिपुरातील हिंसाचारामागचे सत्यशोधन करण्यासाठी भाजपाचे ‘सत्यवादी’ अद्याप का गेले नाहीत? मणिपूरला कोणत्याही निवडणुका नाहीत तरी संपूर्ण राज्य पेटले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी सोडाच, तर भाजपाचे एकही राष्ट्रीय पोपटलाल बोलायला तयार नाहीत. पश्चिम बंगालात हिंसाचार घडला म्हणून भाजपा छाती पिटून घेत आहे. पश्चिम बंगालातील हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्तेही मरण पावले. यावर भाजप काय बोलणार?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

हेही वाचा : VIDEO : “…अन् तेव्हा-तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील”, देवेंद्र फडणवीसांचं…

“दंगली भडकवून धर्मांधतेला खतपाणी घालून…”

“२०१९ साली पश्चिम बंगालातून भाजपाने लोकसभेच्या १८ जागा जिंकून ममता बॅनर्जी यांना हादरा दिला होता. पण, नंतरच्या विधानसभा निवडणुकांत ममतांनी तृणमूलचा गड राखला. पश्चिम बंगालातील जिंकलेल्या १८ जागांमुळे भाजपा त्यावेळी ३०० पार करू शकला. पण यावेळी भाजपा पश्चिम बंगालात मागचा आकडा गाठू शकणार नाही व २०२४ साली ते २०० पार तरी होतील काय? हाच प्रश्न आहे. दंगली भडकवून धर्मांधतेला खतपाणी घालून दोन निवडणुका जिंकल्या हे खरेच, पण आता ते शक्य नाही. आग लावणाऱ्यांना ती विझवायचीही अक्कल लागते. आपलाच देश, आपलेच राज्य राजकीय स्वार्थापोटी पेटवून मजा बघत राहायचे हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते,” अशी टीका ठाकरे गटाने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group shivsena attacks pm narendra modi and bjp over paschim bengal panchayat election ssa
Show comments