काश्मीर आणि हरियाणा यांचे निकाल लागत आहेत. लोक जागरुकपणे निर्णय घेतल्याचं दिसून येतं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक वातावरण तयार झालं होतं. दिल्लीत दुर्दैवाने सरकार त्यांचं परत एकदा बसलं आहे हे संविधान बदलणार. त्यांच्या मनातलं काळं बाहेर आलं होतं. त्यांनी कितीही सांगितलं की हा फेक नरेटिव्ह होता तर ते तसं नाही. अनुभवांचे बोल जास्त महत्त्वाचे असतात. अनुभवांसारखा दुसरा गुरु नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लोकांना मविआकडून अपेक्षा आहेत

लोकांच्या ज्या अपेक्षा महाविकास आघाडीकडून तुम्ही केल्या आहेत त्यात वेगळी गोष्ट काय? आम्ही हेच सांगत होतो. महाराष्ट्रात गुजराती आणि मराठी वाद कधीच नव्हता. पण गुजराती ठग तिथे बसले आहेत, त्यांनी संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी एक भिंत बांधली आहे. वाराणसीत ते का मागे पडले? अयोध्येत का हरले? ही कारणं तुम्ही तिथल्या लोकांना विचारा.

अयोध्येत गळकं राम मंदिर बांधलं आहे

अयोध्येत राम मंदिर बांधलं ते घाईत बांधलं. निवडणुकीच्या आधी घाई केली, गळकं मंदिर बांधलं. तिथले लोक हिंदुत्ववादी नाहीत का? तिथला पराभव कुणी केला? अयोध्येतलं चित्र काय आहे? हे सगळं अदाणी किंवा लोढांसाठी केलंय का? अनेक कारसेवक शहीद झाले. मात्र कंत्राटदार गुजराती, पूजारी गुजराती हे सगळं असल्यावर कसे निवडून येतील? महाराष्ट्रात आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. ही मागणी रास्त आहे. आमचा लढा मुस्लिमांच्या विरोधात आहे का? तर नाही मला एक वाक्य काढून दाखवा शिवसेना प्रमुखांचं मला एक वाक्य काढून दाखवा ज्यात ते सांगत आहेत की आम्ही सरसकट मुस्लिम विरोधी आहे. आपला लढा देशद्रोही विरुद्ध देशप्रेमी असा आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- ‘मविआ’मधील जागावाटपात ठाकरे गटाची कोंडी? नगर जिल्ह्यात हक्काचा मतदारसंघ नाही

मी देशभक्त, देशप्रेमी म्हटलं तर अनेकांच्या पोटात दुखू लागलं.

मी लोकसभेतल्या प्रचारादरम्यान भाषणांत उल्लेख केला देशप्रेमी असा उल्लेख केला तेव्हा अनेकांच्या पोटात दुखलं. बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून लोक फिरत आहेत. त्यामुळे मी देशभक्त बांधवांनो असं म्हटलं होतं. देशभक्त काय हिंदू नाहीत का? महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी जो आमच्या बरोबर येईल तो देशभक्त आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझा महाराष्ट्र कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. असा आपला महाराष्ट्र असताना काय म्हणून या दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारायची? तुम्ही आमचे कोण लागता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला आहे. दुर्दैवाने तुम्ही तिथे बसला आहात. आमचंच पाप आहे की तुम्हाला ओळखत नसताना आम्ही पालखीत बसवून तुम्हाला तिथे नेलं असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.