मागील जवळपास तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दरम्यानच्या काळात शेकडो लोकांची हत्या करण्यात आली आहे. तर हजारो घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या दररोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अलीकडेच मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. एवढंच नव्हे तर जमावाने एका महिलेवर सामुदायिक बलात्कारही केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले. यावर आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मणिपूरमध्ये दोन महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “एक बाब आपल्या सर्वांना समजून घ्यायला हवी. भारतातील लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक घटनात्मक संस्थांची एक लक्ष्मणरेषा आहे. या रेषेवर जेव्हा आक्रमण होईल, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. मणिपूर हिंसाचारासाठी तुम्ही केंद्र आणि राज्यसरकारला दोषी ठरवत आहात. पण मणिपूरमध्ये शांतता असावी, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे.”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “मागील नऊ वर्षाच्या कार्यकाळात भाजपाने ईशान्यकडील राज्यांत ऐतिहासिक कामं केली आहेत. मोदींच्या काळात मणिपूर असो वा जम्मू काश्मीर असो, तिथे शांतता प्रस्थापित झाली आहे. ही राज्य मुख्य प्रवाहाशी जोडली आहेत. ही ऐतिहासिक घटना आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अरुणाचल, नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाम हे राज्य मुख्य प्रवाहशी जोडले असून येथे वेगाने विकास होत आहे.”

“दुर्दैवाने आपल्या शेजारील राष्ट्रांकडून अशा प्रकारची कारस्थानं केली जातात. त्यामुळे जे काम संसदेचं आहे, त्यामध्ये जेव्हा घटनात्मक संस्था हस्तक्षेप करेल, तेव्हा अशी दुर्भाग्यपूर्ण स्थिती निर्माण होते. मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल, याची मला खात्री आहे,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. ते ‘एएनआय’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up cm yogi aadityanath on manipur violence women naked and paraded rmm
Show comments