हिंदू देवी-देवतांविरोधात वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढवून घेणाऱ्या समाजवादी पार्टीच्या नेत्याला न्यायालयाने दणका दिला आहे. देवी-देवतांविरोधात वक्तव्य करून लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि समाजात द्वेष पसरवण्याच्या आरोपांखाली सपाचे माजी सरचिटणीस आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एमपीएमएलए कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश श्रीवास्तव यांनी वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींना मौर्य यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका न्यायलयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी शनिवारी (१६ मार्च) निकाल दिला. गेल्या वर्षी दिपावलीच्या दिवशी स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून वाद निर्माण केला होता. १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देशभरात लोकांनी घरोघरी लक्ष्मीपूजन केलं. दरम्यान, मौर्य यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही फोटो एक्सवर शेअर केले . तसेच हे फोटो शेअर करताना त्यांनी देवी लक्ष्मीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक्सवर लिहिलं होतं की, दीपोत्सवानिमित्त मी माझ्या पत्नीची पूजा आणि तिचा सन्मान केला. जगातल्या कुठल्याही धर्मात, जातीत, वंश, रंग अथवा देशात जन्मलेल्या मुलाला दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे आणि दोन छिद्र असलेलं नाक, एक डोकं, एक पोट आणि एक पाठ असते. परंतु, चार हात, आठ हात, दहा हात, वीस हात, हजार हात असलेलं मूल अद्याप या जगात जन्माला आलेलं नाही. मग चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते? तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीची पूजा करा, तिचा आदर करा. कारण ती तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करते, घरात सुख-समृद्धी नांदेल याची काळजी घेते. तसेच आपली जबाबदारी पार पाडते.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी यापूर्वीदेखील हिंदू देवांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दिवाळीपूर्वी एका कार्यक्रमात ते म्हणाले होते, अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही एक प्रकारची फसवेगिरी आहे. बौद्ध महोत्सवात त्यांनी रामायणातील काही ओळी वाचून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मौर्य म्हणाले, सरकारने अयोध्येत ढोंग रचलं आहे. देशातल्या तरुणांची आणि नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सरकारने अयोध्येत रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग रचलं आहे.