Maha Kumbh Stampede : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात २९ जानेवारी रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याचे समजून एका व्यक्तीची तेरावे घालणे सुरू असताना ती व्यक्ती मंगळवारी अचानक घरी पोहचल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्यक्ती अचानक घरी पोहचल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र नंतर सर्व जण यातून सावरले आणि दु:खाचा क्षण हा आनंदाच्या प्रसंगात बदलून गेला. या घटनेनंतर कुटुंबातील लोक आणि नातेवाईकांनी हा व्यक्त सुखरूप घरी परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेरावं घातलं जात असताना घरी परतलेल्या व्यक्तीचे नाव खुंती गुरू असून तो प्रयागराज मधील चाहचंद गल्ली येथील रहिवासी आहे. जवळपास दोन आठवड्यांनंतर खुंटी गुरू हा अगदी निवांत घरी परतला. त्याचे कुटुंबिय आपला मृत्यू झाल्याचे समजून धार्मिक विधी करत असल्याबद्दल कसलीच कल्पना नव्हती. तो ई-रिक्षातून खाली उतरला आणि त्याला पाहून सगळेच स्तब्ध झाले. “तुम्ही सगळे काय करत आहात?” त्याने अगदी हसत-हसत सगळ्यांना विचारलं, असे वृ्त्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

सामाजिक कार्यकर्ते आभाई अवस्थी यांनी २८ जानेवारीच्या संध्याकाळी खुंटी गुरु कसा निघून गेला होता आणि त्याने मौनी अमावस्येला संगमवर स्नान करण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते याची आठवण करून दिली. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दुसर्‍या दिवशी खुंटी गुरू हा बेपत्ता झाला होता, त्याला शोधण्याचे प्रयत्न झाले पण कुटुंबियांना यश मिळाले नाही. शेजाऱ्यांनी काहीतरी वाईट घडल्याची शंका देखील व्यक्त केली. अखेर काही दिवस शोधाशोध केल्यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृत्यू झाल्याची बाबा स्वीकारली आणि पुढील धार्मिक विधींना सुरूवात केली.

इतके दिवस कुठे होता?

पण घडलं वेगळंच काहीतरी. कुटुंबिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर केले जाणारे विधी पूर्ण करत असतानाच खुंटी गुरू अचानक घरी परतला. त्याला सुखरूप पाहून सुखावलेल्या कुटुंबियांनी तो इतके दिवस कुठे होता? याबद्दल प्रश्न विचारला. यावर त्याने दिलेलं उत्तर मजेशीर आहे. त्याने सांगितलं की, त्याने काही साधूंबरोबर काही चिल्लम घेतल्या आणि त्यानंतर वेळ कसा गेला काही कळलंच नाही. यामुळे तो घरी परतला नाही.

एका छोट्या घरात राहणारा खुंटी गुरू हा एक प्रतिष्ठित वकील कन्हैयालाल मिश्रा यांचा मुलगा आहे. त्याने आपले शिक्षण पूर्ण केलेले नाही आणि कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरातील शिल्लक राहिलेल्या शेवटच्या एका खोलीत तो राहतो.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान २९ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० भाविकांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले होते. मौनी अमावस्येला पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविक प्रयागराजमधील पवित्र त्रिवेणी संगमावर एकाच वेळी पोचल्याने ही चेंगराचेंगरीची घटना घडली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up man missing since maha kumbh stampede returns alive on his tehrvi marathi news rak