उत्तर प्रदेश एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी एका सभेला संबोधित करताना हिंदू विवाहावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. “लोकं म्हणतात आम्ही तीन लग्न करतो. आम्ही दोन जरी लग्न केलीत तरी दोन्ही पत्नींना समाजात आदर देतो. मात्र, हिंदू एकच लग्न करतात आणि त्यांना तीन प्रेयसी असतात. ते पत्नी आणि प्रेयसी दोघांचाही सन्मान करत नाहीत. याउलट आम्ही जर दोन लग्न केलीत, तर दोन्ही पत्नींच्या मुलांची नावं रेशन कार्डवर टाकतो”, असे शौकत अली यांनी म्हटले आहे.
हिजाबबंदीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही शौकत अली यांनी भाष्य केलं आहे. “देशात कोणता पोषाख घालावा हे हिंदूत्व नाही तर संविधान ठरवणार. असे मुद्दे उपस्थित करुन भाजपा देशाला तोडण्याचे काम करत आहे” असे अली यांनी म्हटले आहे. मदरसा, मॉब लिचिंग, वक्फ आणि हिजाब सारखे मुद्दे उपस्थित केल्याने आमच्यावर लक्ष्य करणं भाजपाला सोपं जातं. जेव्हा भाजपा कमकुवत पडते, तेव्हा ते मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित करतात”, असा आरोप अली यांनी केला आहे.
विश्लेषण : कर्नाटकातील कॉलेज ते सुप्रीम कोर्ट; काय आहे हिजाब प्रकरणाची टाइमलाइन?
दरम्यान, शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने वेगवेगळे निकाल दिले आहेत. एकत्रित सुनावणीनंतर एका न्यायमूर्तींनी कर्नाटक सरकारचा हिजाब बंदीचा निर्णय रद्द ठरवला आहे, तर दुसऱ्या न्यायमूर्तींनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश यू. यू. लळित यांच्या अध्यक्षतेखालील नव्या खंडपीठाकडे होणार आहे.