आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलली असून भाजपाच्या चिंतेत भर पाडणारी ऐतिहासिक पत्रकार परिषद शनिवारी दुपारी पार पडली. भाजपाविरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले असून शनिवारी लखनौत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेले नाही. मात्र, रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात उमेदवार उभा करणार नाही, असे मायावतींनी सांगितले आहे.
लखनौतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी अखिलेश यादव आणि मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस व भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती ,काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार झाला, गरिबी वाढली, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस- भाजपाची अवस्था एकसारखीच आहे, दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत, काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा मायावतींनी केला. यापुढे काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.
तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मायावतींना पाठिंबा देताना सांगितले की, ज्या दिवशी भाजपा नेत्याने मायावतींवर आक्षेपार्ह टीका केली होती, त्याच दिवशी महाआघाडीची पायाभरणी झाली होती. मायावतींचा अपमान हा माझा अपमान असल्याचे यादव यांनी सांगितले. पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा देणार का, या प्रश्नाचेही अखिलेश यांनी उत्तर दिले. आम्ही कोणाला पाठिंबा देणार हे सर्वांनाच माहित आहे, असे सूचक उत्तर त्यांनी दिले.
जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले तरी लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मायावती यांनी पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा असून बसपा ३८ आणि सपा ३८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, असेही मायावतींनी सांगितले. तर उर्वरित जागा महाआघाडीत सामील होणाऱ्या अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. अन्य छोट्या पक्षांशी चर्चा सुरु असल्याचे सांगत महाआघाडीत आणखी कोणते पक्ष येणार याचे उत्तर देणे त्यांनी टाळले.