Uttar Pradesh Shahjahanpur MBBS Student suspicious Death : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शाहजहानपूर जिल्ह्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कुशाग्र प्रताप सिंह (२४) असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वरूण अर्जुन वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. कुशाग्र हा मूळचा उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचा रहिवासी होता. पोलीस कुशाग्रच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. महविद्यालयातील वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला आहे. कुशाग्रने आत्महत्या केली आहे की त्याला कोणी वरून ढकलून दिलं होतं, अथवा हा अपघात होता का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या मृत्यूप्रकरणाची माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य कर्नल (सेवानिवृत्त) डॉ. रवींद्र नाथ शुक्ला म्हणाले, “कुशाग्र हा आमच्या महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. त्याचं मूळ गाव गोरखपूरमध्ये आहे. रविवारी वसतीगृहाच्या मागे त्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर आम्ही याबाबत पोलिसांना माहिती दिली. आम्ही पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. आमच्या महाविद्यालयाचं वसतीगृह तीन मजली आहे. कुशाग्र हा त्यातील तळमजल्यावर राहत होता”.

हे ही वाचा >> Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

मृत्यूचं कारण काय? पोलीस म्हणाले…

दरम्यान, पोलीस अधीक्षक राजेश एस यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की प्रथमदर्शनी असं वाटतंय की कुशाग्र वसतीगृहाच्या छतावरून खाली पडला किंवा त्याला कोणीतरी ढकललं असावं. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास चालू आहे. अद्याप आम्हाला कुशाग्रच्या मृत्यूचं कारण समजलेलं नाही.

हे ही वाचा >> S Jaishankar : किम जोंग उन किंवा जॉर्ज सोरोस यांच्यापैकी कोणाबरोबर जेवण कराल? मंत्री एस जयशंकर यांनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले, “मला…”

मेरठमधील एबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात एका एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना समोर आली होती. मृत विद्यार्थी मूळचा मेरठचा रहिवासी होता. परीक्षेची चिंता आणि पालकांवरील कर्जाच्या ओझ्यामुळे तो अनेक दिवस तणावाखाली होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा खून झाला असल्याचा आरोप केला होता.