उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘रालोआ’चे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी  काँग्रेसप्रणित ‘यूपीए’चे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींचा पराभव केला आहे. व्यंकय्या नायडू यांच्या पारड्यात ५१६ मते पडली असून गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली.  या विजयासाठी गोपाळकृष्ण गांधी यांनी व्यंकय्या नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत मतदान झाले. ७८५ पैकी ७७१ जणांनी मतदान केले. संध्याकाळी पाच पर्यंत ९८. २१  टक्के मतदान झाले.

उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे खासदार मतदान करीत असतात. या निवडणुकीत ७९० मतदार होते. स्वत: एनडीएकडे सव्वाचारशे मते होती. शिवाय त्यांना अण्णाद्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेससारख्या काही कुंपणावरच्या पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे विजयासाठी ३९६ मतांची आवश्यकता असताना नायडूंना मिळणाऱ्या मतांची संख्या पाचशेचा टप्पा गाठण्याचा अंदाज होता. अपेक्षेप्रमाणे नायडूंनी बाजी मारली.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या बिजू जनता दल व संयुक्त जनता दलाने उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी यांना पाठिंबा दिला होता. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतरही मुख्यमंत्री नितीशकुमार गांधींच्या पाठिंब्यावर ठाम राहिले होते. महात्मा गांधीजींचे नातू असलेले डॉ. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. या पराभवावर गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला मतदान करणाऱ्यांचा मी आभारी आहे. मी व्यंकय्या नायडूंचे अभिनंदन करतो असे त्यांनी सांगितले. तर आमचा पराभव किंवा विजय झाला तरी आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही असे काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद यांनी सांगितले.

११ ऑगस्टरोजी नायडू यांचा शपथविधी होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १ ऑगस्टला संपला आहे. नायडू यांच्या विजयनांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vice presidential election 2017 bjp venkaiah naidu wins poll secured 516 votes beat congress gopalkrishna gandhi