Vinesh Phogat’s Shocking Claim: भाजपा नेते बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर विनेश फोगट देशभरात चर्चेत आली. खेळाडूंच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या काही प्रमुख कुस्तीपटूंपैकी विनेश फोगट एक होती. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीआधी अपात्र झाल्यामुळे पुन्हा एकदा विनेश फोगटची चर्चा झाली आणि आता काँग्रेसकडून हरियाणातील जुलाना मतदारसंघातून विनेश विधानसभा निवडणूक लढवत आहे. पण या सगळ्याची सुरुवात झाली ती कुस्तीपटूंच्या प्रदीर्घ आंदोलनातून. त्यावेळी कुस्तीपटूंवर होत असलेल्या अत्याचारांवर अवघ्या देशातून सहवेदना व संताप व्यक्त होत होता. पण शेवटी-शेवटी विनेश फोगट भारत सोडून जाण्याच्या विचारापर्यंत पोहोचली होती! तिनं स्वत:च एका मुलाखतीमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे.

कुस्तीपटूंच्या तक्रारी, त्यावर बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण, त्यावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेची भूमिका, कायदेशीर लढा अशा सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी ठाण मांडलं होतं. यादरम्यान कधी आंदोलकांची समजूत काढण्याचा तर कधी त्यांना जंतरमंतरवरून पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला. या प्रसंगांची दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. देशाचा मान असणाऱ्या कुस्तीपटूंनी दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर संतप्त भावनाही व्यक्त झाल्या. तरीदेखील न्याय मिळण्यास विलंब होत असल्याचं पाहून विनेश फोगटनं देश सोडून जाण्याचा विचार पक्का केला होता!

विनेश फोगटनं मोदींच्या फोन कॉलसंदर्भात मोठा दावा केला आहे! (फोटो – पीटीआय संग्रहीत)

काय म्हणाली विनेश फोगट?

विनेश फोगटनं ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपला देश सोडून जाण्याचा विचार तेव्हा पक्का झाला होता, असं विधान केलं आहे. हे आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडी या विनेश फोगटला राजकारणात येण्यासाठीचा ड्रामा होता, अशी टीका बृजभूषण सिंह यांनी केल्याबाबत तिला मुलाखतीत विचारणा करण्यात आली. त्यावेळी विनेश फोगटनं त्यावर स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.

“आम्ही जंतर-मंतरवर बसलो तेव्हा त्या आंदोलनासाठी परवानगी भाजपाच्या दोन नेत्यांनी घेतली होती. मी त्यांची नावं घेऊ शकत नाही. पण भाजपाच्याच हरियाणातील दोन नेत्यांनी परवानगी घेतली होती. आम्ही एवढं नाव तर नक्कीच कमावलं होतं की आमची राजकारणात यायची इच्छा असती, तर आम्हाला कोणत्याही पक्षानं नकार दिला नसता. नाव, पैसा असं सगळं आमच्याकडे होतं. तरीही आम्ही तिथे आंदोलन करण्याची काय गरज होती? आम्ही राजकारणासाठी त्या पातळीवर नाही जाऊ शकत जेवढं हे लोक जात आहेत”, असं विनेश म्हणाली.

“मग तुमचं सरकार काय झोपलं होतं का?”

“ते म्हणत होते मला नॅशनल गेम्स खेळायचे नव्हते, मी खेळले. मी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले. आता म्हणतायत ऑलिम्पिकपर्यंतही नाटक करूनच गेले. मग तुमचं सरकार काय झोपलं होतं का? मी एवढीच ताकदवान असते, तर सगळ्यात आधी मी बृजभूषणला तुरुंगात टाकलं असतं”, अशा शब्दांत विनेश फोगटनं आपला संताप व्यक्त केला आहे.

Vinesh Phogat: मोदींनी फोन केला होता, पण विनेशनं बोलण्यास नकार दिला; म्हणाली, “त्यांची अट होती की…”

देश सोडायचं ठरलं होतं, पण प्रियांका गांधींनी समजूत घातली!

दरम्यान, मी देश सोडायचं पक्कं केलं होतं, पण प्रियांका गांधींनी माझी समजूत घातली, असं विनेश फोगट यावेळी म्हणाली. “मी देश सोडण्याचा विचार केला होता. माझं ठरलं होतं. मी त्यासंदर्भात लोकांशी चर्चाही करून ठेवली होती. माझं सगळं ठरलं होतं. या देशात आमचं काहीच राहिलेलं नाही, या निष्कर्षापर्यंत मी आले होते. पण परमात्मा काही लोकांशी तुमची त्या वेळेत भेट घालून देतो. हे लोक त्या वेळेत दोन शब्दांमध्ये अशी हिंमत देतात, की दुसरं कुणीही देऊ शकत नाही. मी देश सोडण्याबाबत पूर्णपणे गंभीर होते. सगळं ठरलं होतं. पण तेव्हा माझी प्रियांका गांधींशी भेट झाली. त्यांनी मला समजावून सांगितल्यानंतर आम्ही निर्णय बदलला”, असा खुलासा विनेश फोगटनं केला आहे.

काय सांगितलं प्रियांका गांधींनी?

“प्रियंका गाधींनी मला सांगितलं की त्यांच्या वडिलांच्या बाबतीत जे काही घडलं, तेव्हा त्यांनाही वाटलं होतं की देश त्यांना न्याय देत नाहीये. पण नंतर जेव्हा लोकांचं प्रेम पाहिलं, जिथून त्यांचे वडील निवडणूक लढवत होते, तिथे त्या गेल्या, लोकांचं प्रेम तिथे पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की देश त्यांच्यावर खूप प्रेम करतो. तिथून त्यांना आशा वाटू लागली. एक-दोन लोकांसाठी पूर्ण देशाला आपण दोष देऊ शकत नाही, असं वाटल्याचं प्रियांका गांधींनी मला सांगितलं”, असं विनेश फोगट यावेळी म्हणाली.

“त्यानंतर आम्ही ठरवलं की या देशात राहूनच लढाई लढावी लागेल. आम्ही बाहेर गेलो तर दुसरं कुणीतरी इथे बळी पडेल. त्यामुळे आपल्यालाच भगतसिंग बनावं लागेल, दुसरं कुणी येणार नाही असं आम्ही ठरवलं. कधीकधी तुमच्या सगळ्या आशा संपुष्टात येतात तेव्हा कुणालातरी ईश्वर तुमच्याशी बोलण्यासाठी पाठवतो”, असंही विनेशनं सांगितलं.