भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना घुसून मारतं, असा आरोप केला जातोय. या आरोपांवर अमेरिकेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानमधील होत असलेल्या हत्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या अहवालाचं निरिक्षण अमेरिकेकडून केलं जात असलं तरी या अहवालावर बोलण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, पाकिस्तानातील हत्येत भारताचा सहभाग असलेल्या आरोपांच्या अहवालावर आमचं निरिक्षण सुरू आहे. परंतु, मूळ आरोपांवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. तसंच, या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार नसलो तरी हा वाद वाढू नये म्हणून मध्यस्तीकरता संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत. २०२० मध्ये पाकिस्तानमध्ये जवळपास २० हत्या झाल्या होत्या. या हत्यांमध्ये भारत सामील असल्याचा आरोप केला जाता होता. परंतु, भारताने पाकिस्तानमध्ये हत्या घडवून आणल्याच्या दाव्याचे ठामपणे खंडन भारताने केले आहे. तसंच, द्वेषपूर्ण भारतविरोधी प्रचार करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भारत सरकारच्या रिसर्च अँण्ड अॅनालिसिस विंगने दिली आहे. खलिस्तान चळवळीतील शीख फुटीरतावाद्यांना लक्ष्य करणे यासह परकीय भूमीवरील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी या हत्या करण्यात आल्या होत्या, असं युकेतील गार्डियन या वृत्तपत्राने वृत्त दिलं होतं. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर या हत्या घडून आल्यामुळे भारतावर हा आरोप करण्यात येत होता. परंतु, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे दावे स्पष्टपणे नाकारले आहेत. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी हे दावे फेटाळून लावून या हत्यांचा भारत सरकारच्या धोरणांशी संबंध सल्याचं म्हटलं आहे.