लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘एनडीए’तील प्रमुख घटक पक्षांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी लेखी पाठिंबा दिल्यामुळे केंद्रात ‘इंडिया’ आघाडीच्या सरकारची शक्यता मावळू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. तरीही ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सरकार स्थापनेच्या शक्यतेवर चर्चा केली. जनमताचा कौल भाजपविरोधात असून हा सत्ताधारी पक्षाची नैतिक पराभव आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पाऊले उचलू, असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

‘इंडिया’ आघाडीकडे २३४ चे संख्याबळ असून बहुमतासाठी विरोधकांना ३८ जागांची गरज आहे. एनडीएमध्ये असलेले नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला तरच विरोधकांचे केंद्रात सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण होते. तसे झाले नाही तर एनडीएमध्ये नसलेल्या अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. तृणमलू काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे बुधवारी दिल्लीत दाखल झाल्या. खरगेंनी फोनवरून इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात बोलणे झाले असले तरी, नितीशकुमार वा चंद्राबाबू नायडू यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही, त्यांच्याशी मी संपर्क करणारही नाही, असे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>>मोदी यांचे जगभरातून अभिनंदन; सलग तिसऱ्या ऐतिहासिक विजयाबद्दल कौतुकाचा वर्षाव

आपण भाजपविरोधात निर्धाराने, एकजुटीने लढलो. यापुढेही लढत राहू. संविधानाच्या प्रस्तावनेतील मूल्यांची जपणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संविधानीतील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाच्या विविध तरतुदींशी आपली मूलभूत बांधिलकी आहे, असे खरगे बैठकीत म्हणाले.

खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्याशिवाय, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, ठाकरे गटाचे नेते संजय़ राऊत, अरविंद सावंत, सपचे प्रमुख अखिलेश यादव, पवार गटाचे शरद पवार, सुप्रिया सुळे, माकपचे महासचिव सीकाराम येचुरी, भाकपचे महासचिव डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, कल्पना सोरेन, आपचे संजय सिंह, राघव चड्ढा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आदी नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीची चर्चा

इंडिया आघाडीच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन नेते अनुपस्थित राहिले. ‘इंडिया’चे सरकार स्थापन झाले तर बाहेरून पाठिंबा देण्याचे ममतांनी स्पष्ट केल्यामुळे त्यांच्या उपस्थितीची शक्यता कमीच होती. पण, उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. असे असताना ठाकरे दिल्लीतील ‘इंडिया’च्या बैठकीला गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ठाकरेंऐवजी संजय राऊत व अरविंद सावंत बैठकीला उपस्थित होते.