Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस झाला. मात्र, असं असलं तरी ऑगस्ट महिन्यात देशभरात सरासरी तापमान २४.२९ अंश सेल्सिअस इतकं होतं. १९०१ नंतर सर्वात जास्त उष्णता असलेला यावेळचा ऑगस्ट महिना नोंदवला गेला असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे.

‘आयएमडी’च्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये देशभरात सरासरी किमान तापमान २४.२९ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हे तापमानापेक्षा ०.६१ अंश सेल्सिअस जास्त होतं. १९०१ नंतरचं ऑगस्टमधील यावेळी सर्वात उष्ण तापमान नोंदवलं गेलं आहे. ऑगस्टमध्ये मध्य भारत आणि दक्षिण भारतात रात्रीचं तापमान खूप जास्त उष्ण राहिलं आहे. मध्य भारतात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ०.५५ अंश सेल्सिअस जास्त (२४.२६ अंश सेल्सिअस) होतं. तसेच दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्य तापमानापेक्षा ०.७२ अंश सेल्सिअस (२४.१२ अंश) जास्त होतं. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : Madhya Pradesh : कंटेनर चालकाचे हात-पाय बांधले अन् १२ कोटींचे आयफोन चोरले; घटनेची थेट ‘आयजीं’नी घेतली दखल, तीन पोलीस निलंबित

ऑगस्ट महिन्यात दक्षिण भारतात २०२.४ मिमी (६.६ टक्के) पाऊस पडला. दरम्यान, या ठिकाणी नोंदवले गेलेले सरासरी किमान तापमान २४.१२ अंश सेल्सिअस होते. इतरवेळी सामान्य २३.४१ अंश अंश सेल्सिअस होते. मध्य भारतात ३५९.६ मिमी (१६.५टक्के) पाऊस पडला. या ठिकाणी सरासरी किमान तापमान २४.२६ अंश सेल्सिअस (२३.७१अंश सेल्सिअस) नोंदवले गेले. दरम्यान, या वर्षीचा ऑगस्ट महिना हा पूर्व आणि ईशान्य भारत आणि वायव्य भारतातील सर्वात उष्ण होता असं ‘आयएमडी’च्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

ऑगस्टमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची नोंद

ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त होतं. देशातील बहुतेक भागात विशेषतः मध्य भारतात सरासरी किमान तापमानापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. तसेच गेल्या सहा वर्षांतील भारतातील ऑगस्टच्या पावसाची तुलना केल्यास असं दिसून आलं की, २०१९ नंतर २०२४ मध्ये मासिक पर्जन्यमानाची कामगिरी सर्वाधिक होती. तसेच २०२१ आणि २०२३ मध्ये पावसाची लक्षणीय तूट नोंदवली गेली.