Abhishek Banerjee : लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज काही खासदारांनी अर्थसंकल्पाबाबत त्यांची मतं मांडली तसंच अनेकांनी मोदी सरकारच्या काळातील काही योजनांचाही उल्लेख केला. अशात तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचं भाषणही चर्चेत आलं आहे. कारण ते नोटबंदीच्या विषयावर बोलत होते. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अडवलं. यावर अभिषेक बॅनर्जींनी ( Abhishek Banerjee ) खोचक प्रश्न विचारला. ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

काय म्हणाले अभिषेक बॅनर्जी? ( What Abhishek Banerjee Said? )

अभिषेक बॅनर्जी भाषणाला उभे राहिले तेव्हा भाजपाच्या काही सदस्यांनी ममता बॅनर्जींचं नाव घेऊन टीका करायला सुरुवात केली. यावर अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूलचे इतर खासदार आक्रमक झाले. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सदस्यांना बजावलं की जे सदनाचे सदस्य नाहीत त्यांच्यावर बोलू नका. ज्यानंतर अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “अध्यक्ष महोदय, तुम्ही जो नियम सांगितलात तो योग्य आहे. जो या सदनाचा सदस्य नाही त्यांच्याविषयी बोलायला नको. मग ममता बॅनर्जी या सदनाच्या सदस्य नाहीत. त्यांचं नाव का घेण्यात आलं? त्याबद्दल आधी भाजपाच्या खासदारांनी माफी मागावी त्यानंतर मी माझं भाषण करेन.” त्यावर ओम बिर्ला म्हणाले तुम्ही असं करु नका. त्यावर अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “अध्यक्ष महोदय तुम्ही तुमच्या पदाचा मान ठेवा. ही विनंती मी तुम्हाला हात जोडून करतो. तुम्ही त्यांना माफी मागायला लावा.” त्यावर ओम बिर्ला म्हणाले, “ममता बॅनर्जींचं नाव आम्ही रेकॉर्डवर घेतलेलं नाही. तुम्ही तुमचं भाषण पुढे सुरु ठेवा, जर सुरु ठेवायचं नसेल तर मला निर्देश देऊ नका.” यानंतर अभिषेक बॅनर्जींनी ( Abhishek Banerjee ) पुन्हा भाषण सुरु केलं.

हे पण वाचा- Budget 2024 : सरकारचं लक्ष केवळ ‘वंदे भारत’वर, गरीबांच्या गाड्यांकडे दुर्लक्ष? रेल्वेमंत्री म्हणाले…

मोदी सरकारने सेंट्रल व्हिस्टावर हजारो कोटी खर्च केला बेघराचं काय?

अभिषेक बॅनर्जी ( Abhishek Banerjee ) म्हणाले, “या सरकारने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर काही हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र जे बेघर लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय केलंत? या सरकारकडे दूरदृष्टी नाही, तसंच थोडीशी लाजही नाही. मागील दहा वर्षांत मोदी सरकारचं धोरण असं होतं की त्यांनी बंगालचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. बंगालची प्रतिमा मलीन कशी होईल ते पाहिलं. केंद्र सरकारने निधी दिला त्याचा उपयोग बंगालला करता आला नाही असा आरोप निर्मला सीतारमण यांनी केला. माझं त्यांना आव्हान आहे की मागच्या वर्षांमध्ये जो निधी दिला त्याबाबत श्वेतपत्रिका काढा. २०२१ मध्ये बंगालची निवडणूक हरल्यानंतर मनरेगासाठी किती पैसे दिले, गृहप्रकल्पांसाठी किती पैसे दिले? याबाबत श्वेतपत्रिका काढून स्पष्ट केलं की तुम्ही १० पैसे दिले आहेत. बंगालकडे येणारा निधी जाणीवपूर्वक थांबवला गेला आहे.” असा गंभीर आरोप अभिषेक बॅनर्जींनी ( Abhishek Banerjee ) केला. या भाषणादरम्यान गदारोळही पाहण्यास मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा नोटबंदीच्या मुद्द्यावर ओम बिर्ला आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात जुगलबंदी झाली. ज्यावर अभिषेक बॅनर्जींनी ( Abhishek Banerjee ) ओम बिर्लांना निरुत्तर करणारा प्रश्न विचारला.

खुर्ची वाचवणारा अर्थसंकल्प सादर झाला

“२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सगळे म्हणत मोदी सरकार आलं, २०१९ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा दुसऱ्यांदा मोदी सरकार आलं असं सगळे म्हणाले, त्यानंतर २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना जनतेने स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. त्यांना एक प्रकारे नाकारण्यात आलं. आता कुणीही मोदी ३.० सरकार असं या सरकारला म्हणत नाही. केंद्रातले मंत्रीही मोदी ३.० सरकार म्हणत नाहीत. आता वेळ बदलली आहे, भाजपाकडून फक्त खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न चालला आहे, त्याची झलक अर्थसंकल्पात दिसून आली.” असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

नोटबंदीवरुन काय म्हणाले अभिषेक बॅनर्जी?

मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. ५०० आणि एक हजारच्या नोटा बंद केल्या. त्या नोटबंदीचा काय उपयोग झाला? देशभर १३० जणांचा प्राण नोटा बदलण्याच्या रांगांमध्ये गेला. या सरकारने नोटबंदी लादली. हा निर्णय अतिशय चुकीचा होता.” असं अभिषेक बॅनर्जी ( Abhishek Banerjee ) म्हणाले. ज्यावर ओम बिर्ला म्हणाले, “सन्मानीय सदस्य २०१६ हे वर्ष निघून गेलं. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकाही झाल्या. आत्ताच्या अर्थसंकल्पावर बोला. वर्तमान काळावर बोला.” त्यावर अभिषेक बॅनर्जी आक्रमक होत म्हणाले, “कुणी ६० वर्षांपूर्वीच्या जवाहरलाल नेहरुंचं नाव घेतं, इतर नेत्यांची नावं घेतात तेव्हा तुम्ही त्यांना हे सांगत नाही. मी पाच वर्षांपूर्वीच्या नोटबंदीवर बोलतोय तर मला वर्तमान काळावर बोलायला सांगत आहात. हा पक्षपात आहे. मी अर्थसंकल्पावरच बोलतो आहे. ५० वर्षांपूर्वीच्या इमर्जन्सीचा उल्लेख चालतो का?” हे प्रश्न विचारुन अभिषेक बॅनर्जींनी ओम बिर्लांना निरुत्तर केलं.