लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. जनतेने एनडीएला कौल दिला असून बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपाला युपीतून मोठा पाठिंबा मिळत आलेला आहे. मात्र, यावर्षी जनतेने भाजपाला सपशेल नाकारले आहे. तसेच महाराष्ट्रातही मोठा फटका बसला आहे. परंतु, बिहारमध्ये नितीश कुमारांसोबत युती करून भाजपाला फायदा झाला असून दोघांच्याही जागा कायम आहेत.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. भाजपाला १२ जागा, तर जनता दल युनायटेडला १२ जागा मिळाल्या आहेत; तर राष्ट्रीय जनता दल ४ जागा आणि काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये एनडीएचा वरचष्मा आहे. भाजपासोबत नितीश कुमारांचा जदयू पक्ष असला तरी एनडीएमध्ये शेवटपर्यंत सोबत असणे महत्त्वाचे आहे. कारण नितीश कुमार यांनी अनेकदा पलटी मारलेली आहे. एकटा भाजपा बहुमतापासून लांब आहे. अशात नितीश कुमार यांनी साथ सोडली तर भाजपाचे तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येत असतानाच बिहारमधील जदयू आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जदयू नेता आमदार डॉ. खलिद अनवर म्हणाले, “पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणीच असू शकत नाही.” डॉ. खलिद अनवर यांच्या या विधानाने भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. तसेच नितीश कुमार यांच्या मनात नक्की काय आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
(हे ही वाचा: Video: इंडिया आघाडीत पोस्टरवरुन बिघाडीची ठिणगी; यूपीत सपा करणार खेळ, ‘या’ पोस्टरमुळे …)
जेडीयू एमएलसी डॉ. खालिद अन्वर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, ते एक अनुभवी नेते आहेत जे देश आणि समाज चांगल्या प्रकारे समजून घेतात. देशाला समजून घेणारा त्यांच्यासारखा नेता नाही. याशिवाय नितीशकुमार हे सर्व लोकशाही संस्थांचा आदर करतात. मात्र, जेडीयू सध्या एनडीएचा भाग आहे.
ते पुढे म्हणाले की, “लोकांना नितीश कुमार यांना देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे. आजच्या निवडणूक निकालांनी लोकांमध्ये आशेचा किरण जागवला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने बिहारचा विकास केला. कृषिमंत्री असताना त्यांनी देशासाठी केलेले काम आजही पाळले जात आहे. त्यांनी रेल्वेमंत्री असताना केलेली कामे आजही स्मरणात आहेत.”
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकीय घडामोडी बदलत असल्याचे चित्र आहे. भाजपाला गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदा बहुमतापेक्षा कमी आकडा मिळाला आहे. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तर नितीश कुमार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तर दुसरीकडे एनडीच्या नेत्यांनी उद्या दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं आहे.