तेलंगणातील काँग्रेसचे नेते राशीद खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांवर हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवरून टीका केली आहे. “भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,” असं राशीद खान यांनी म्हटलंय.

मी भारताला कधीही हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही, असे राशीद खान म्हणाले. ते म्हणाले, “मी जिवंत असेपर्यंत भारताला कधीच हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, आणि बजरंग दल हे त्यांचे हिंदू राष्ट्र घडवण्याचे स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाहीत.” यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

राशीद खान म्हणाले की, मुस्लिमांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष आहे. तसेच काँग्रेसने भेदभाव न करता सर्व धर्मांना समान वागणूक दिल्याचा दावा त्यांनी केला.

राशीद खान यांचं यापूर्वीचं वादग्रस्त वक्तव्य…

राशीद खान यांनी यापूर्वी हिंदू धर्म स्वीकारलेल्या वसीम रिझवी म्हणजेच जितेंद्र नारायण त्यागींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी ६ डिसेंबर रोजी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. यासोबतच त्यांनी आपलं नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी केलं. रिझवी यांनी धर्म बदलल्यानंतर रिझवींचं शीर धडावेगळं करणाऱ्याला ५० लाख आणि २५ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा तेलंगणातील काँग्रेस नेते फिरोझ खान आणि राशीद खान यांनी केली होती.

“रिझवी म्हणजेच जितेंद्र नारायण सिंह त्यागी कोणता धर्म मानतात, याची आम्हाला पर्वा नाही. भारत धर्मनिरपेक्ष आहे, कोणीही कोणत्याही धर्माचे पालन करू शकतो. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. पण त्यांनी आमच्या धर्माचा अनादर करू नये. जर त्यांनी पुन्हा तसे केले तर आम्ही त्याला ठार मारू शकतो,” असे तेलंगणा काँग्रेसचे नेते रशीद खान म्हणाले होते.