पठाणकोटवरील हल्ल्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा इशारा
दहशतवादी हल्ले करून आपल्याला वेदना देणाऱ्या देशाला तशाच वेदना दिल्या पाहिजेत. जशास तसे प्रत्युत्तर दिले नाही तर अशा घटना थांबणार नाहीत. हे प्रत्युत्तर केव्हा, कसे व कोठे द्यायचे हे आता भारत ठरवील, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी दिला. लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांच्यासह अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पर्रिकर यांनी हे वक्तव्य केले.
पठाणकोटच्या हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांचा आम्हाला अभिमानच आहे. त्याचबरोबर त्यांच्या बलिदानाचे आम्हाला दु:खही आहे. हल्ला झाला तर काही सैनिकांना प्राण गमवावे लागणारच, युद्धात सैनिक हुतात्मा होऊ शकतात हे खरे. पण तरी या हल्ल्यात एक सैनिक प्रत्यक्ष चकमकीत हुतात्मा झाला. स्वत:चा जीव देण्यापेक्षा देशाच्या शत्रूंचा प्राण घ्या, असेच आपण सैनिकांना सांगितले पाहिजे. आपल्या शत्रूला नेस्तनाबूत केले पाहिजे, असे पर्रिकर म्हणाले. कुणी येऊन तुम्हाला मारले तर शांत बसायचे असे कुठे धोरण असू शकते का, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानने पुरावे नाकारले?
इस्लामाबाद : पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचे आदेश देणाऱ्या पाकिस्तानने सोमवारी खरे रंग उधळण्यास सुरुवात केली. या दहशतवादी हल्ल्याचे भारताने दिलेले पुरावे पाकिस्तानने नाकारल्याचे वृत्त ‘द न्यूज’ या पाकिस्तानातील वृत्तपत्राने दिले आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानात केलेले दूरध्वनी क्रमांक पाकिस्तानचे नसल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. प्राथमिक तपासानंतर पाकिस्तानने याबाबतचा आपला अहवाल भारताकडे सोपविला असल्याचेही वृत्तपत्राने म्हटले असले तरी पाकिस्तानकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दहशतवादाच्या मुद्दय़ावर आपण गंभीर आहोत, असे तातडीने स्पष्ट करून या हल्ल्याच्या तपासाचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिले असले तरी या हल्ल्याचा पाकिस्तानशी काडीचाही संबंध नाही, असे ‘द न्यूज’च्या वृत्तामधून दर्शविण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे.

वेदना देणाऱ्यांना ती वेदना काय असते ते कळत नाही, तोपर्यंत त्यांच्यात बदल होत नाही असा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे पठाणकोटमधील हल्ल्यावर सरकारी विचाराने काही होणार नाही. जर कुणी तुम्हाला हानी पोहोचवली, तर त्या व्यक्ती किंवा संघटनेला तसेच प्रत्युत्तर देऊन तशीच वेदना दिली पाहिजे.
 -मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will take pathankot attack revenge on time say manohar parrikar