Winter Session Of Parliament Working : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. या अधिवेशनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे तिसऱ्या सत्रात सर्वाधिक ६५ तास वाया गेले आणि तीन सत्रांमध्ये मिळून ७० तासांपेक्षा जास्त वेळ वाया गेला. संसदेचे हे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर रोजी सुरू झाले होते. त्याचा आज अचानक समारोप झाला. अधिकृत आकडेवारीनुसार, संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमुळे खूप मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये पहिल्या सत्रात एकूण ५ तास ३७ मिनिटे, दुसऱ्या सत्रात १ तास ५३ मिनिटे आणि तिसऱ्या व शेवटच्या सत्रात ६५ तास १५ मिनिटे वाया गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चर्चेच्या दृष्टीने, लोकसभेत पहिल्या सत्रात ३४ तास १६ मिनिटे चर्चा झाली. तर ही चर्चा दुसऱ्या सत्रात ११५ तास २१ मिनिटांवर गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र, तिसऱ्या सत्रात हा आकडा अवघ्या ६२ तासांवर आला. यातून लोकसभेतचे कामकाज कसे झाले हे दिसते. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात सात, दुसऱ्या टप्प्यात १५ आणि तिसऱ्या टप्प्यात २० बैठका झाल्या.

लोकसभेत ८ विधेयके मंजूर

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात एकूण सात तास अधिक चाललेल्या कार्यवाहीत खासदारांनी उपस्थिती लावली. तर दुसऱ्या सत्रात अतिरिक्त ३३ तास खासदारांनी उपस्थिती दर्शवली. वाया गेलेला वेळ भरुन काढण्यासाठी लोकसभेचे कामकाज २१ तास ७ मिनिटे वाढवल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सरकारकडून एकही विधोयक सादर करण्यात आले नव्हते. मात्र, दुसऱ्या सत्रात सरकारने सादर केलेल्या १२ पैकी ४ विधेयकांना संसदेत मंजूरी मिळाली. तिसऱ्या सत्रात सरकारने पाच विधेयके सादर केली होती. त्यातील चार विधेयके मंजूर झाली.

राज्यसभेच्या सभापतींनी व्यक्त केली नाराजी

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती असलेले जगदीप धनखड यांनी अधिवेशन काळातील खासदारांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “जग आपल्या लोकशाहीकडे पाहते. तरीही आपण आपल्या आचरणातून नागरिकांच्या अपेक्षा खोट्या ठरवतो. संसदेतील आपल्या वर्तनातून आपण जनतेच्या विश्वासाची आणि अपेक्षांची खिल्ली उडवत आहोत. आपले मूलभूत कर्तव्य नागरिकांची सेवा करणे आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.”

हे ही वाचा :  “मी त्यांची बहीण, असे कृत्य…”, राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; प्रियांका गांधी यांची पहिली प्रतिक्रीया

अमित शाह यांच्या विधानामुळे विरोधक आक्रमक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत बोलताना, “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची आता फॅशन झाली आहे. त्यांनी इतक्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते”, असे म्हटले होते. अमित शाह यांच्या विधानानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक होत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

अमित शाह यांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी काल संसद भवन परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांनी पदयात्रा काढली होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी खासदार समोरासमोर आल्याने मकरद्वारापाशी धक्काबुक्की झाली. यामध्ये भाजपाचे प्रताप चंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत हे दोन खासदार जखमी झाले होते. यातील सारंगी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा आरोप केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter session of parliament rajya sabha loksabha one nation one election rahul gandhi amit shah pm narendra modi aam