लग्नानंतर मधुचंद्राला जाणं ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. मधुचंद्राला कुठे जायचं? यावर अनेकदा अनेक जोडपी लग्न ठरल्यापासूनच योजना आखून ठेवतात. मधुचंद्र आठवणीत कसा राहिल यासाठी दोघांचाही हा प्रयत्न असतो. मात्र मधुचंद्राहून परत आल्यावर कुणी घटस्फोट मागितला तर? होय अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. पतीने गोव्याला मधुचंद्रासाठी घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं पण तो अयोध्येला घेऊन गेला हे कारण देत पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे.

काय आहे पत्नीचंं म्हणणं?

“मधुचंद्रासाठी गोव्याला नेणार हे सांगून आपल्याला पती गोव्याला घेऊन गेला ही तक्रार करत मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नानंतर मधुचंद्राला गोव्याला घेऊन जाईन असं मला माझ्या पतीने सांगितलं होतं. मात्र तो अयोध्येला घेऊन गेला. इतकंच नाही तर पतीने त्याच्या आईलाही आमच्या बरोबर घेतलं.” असं या पत्नीने म्हटलं आहे. तसंच या घटनेनंतर चिडलेल्या महिलेने कोर्टात थेट घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधली ही घटना आहे.

नेमकी काय घडली घटना?

भोपाळमधल्या पिपलानी या ठिकाणी राहणाऱ्या या जोडप्याचं लग्न ऑगस्ट २०२३ मध्ये झालं होतं. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचा नवरा आयटी क्षेत्रात काम करतो आणि त्याला चांगला पगार मिळतो. मधुचंद्रासाठी विदेशात जाणंही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. असं असूनही मधुचंद्रासाठी तो अयोध्येला घेऊन गेला. तसंच त्याने आमच्या बरोबर आईलाही घेतलं. अयोध्या आणि बनारस या ठिकाणी घेऊन गेला त्यामुळे पत्नीचा तिळपापड झाला. पतीने मधुचंद्रासाठी विदेशात जाण्यास नकार दिला. तो म्हणाला मला आई वडिलांची सेवा करायची आहे. त्यामुळे आपण देशातल्या देशात मधुचंद्रासाठी जाऊ. त्यानंतर आम्ही दोघांनीही गोव्याला जाण्याचा बेत ठरवला. मात्र पती गोव्याला न घेऊन जाता अयोध्येला घेऊन गेला. असं घटस्फोटाच्या अर्ज केलेल्या महिलेने सांगितलं आहे.

मधुचंद्राहून परत आल्यावर पत्नीचा राग अनावर

महिलेने सांगितलं की पतीने अयोध्या आणि बनारससाठी विमान तिकिट बुक केलं होतं. याचं कारण त्याच्या आईला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेपूर्वी अयोध्येला जायचं होतं. जेव्हा त्याने ही बाब मला सांगितली तेव्हा मी शांत राहिले मात्र मधुचंद्राहून परत आल्यावर दहा दिवसांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर मी कोर्टात धाव घेतली. माझा पती माझ्यापेक्षा जास्त त्याच्या कुटुंबीयांची काळजी घेतो असंही पत्नीने तिच्या घटस्फोटासाठीच्या अर्जात नमूद केलं आहे. भोपाळ कौटुंबिक न्यायालयाचे वकील शैल अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या जोडप्याचे समुपदेशन केले जात आहे.