26 July Mumbai Floods Reasons: २६ जुलै २००५ रोजी मुंबईत पडलेल्या ९४४ मिलिमीटर पावसामुळे मुंबापुरी पाण्याखाली गेली होती. या पावसाने शहर तीन दिवस बंद होते. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईची तुंबई झाली होती. पाणी साचल्यामुळे मुंबईकर ठिकठिकाणी अडकले होते. लोकांवर रस्ते, लोकल, वाहनांमध्ये राहण्याची वेळ आली होती. या दिवशी ४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर ५०० कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेल्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. अठरा वर्षांपूर्वी मिठी नदी कोपल्याने मुंबई बुडाली, पण मिठी नदी का कोपली? मिठी नदीच्याबाबत असे काय घडले की जेणेकरून तिने रौद्ररुप धारण केले.

२६ जुलैला नेमकं काय घडलं आणि का घडलं

तर सर्वात आधी नदी कशी वाहते? कशा पद्धतीने वाहते? हे समजून घेऊयात, हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की, नदीला पूर का येतो. मग यामध्ये दहिसर नदी असेल, ओशिवरा नदी असेल, पोयसर नदी असेल किंवा मग मिठी नदी असेल; या नद्यांना पूर का येतो हे समजून घेऊयात. मुंबईतील सर्व नद्यांना पावसाळ्यात पूर येण्याचे प्रसंग गेल्या काही वर्षांत तसे नेहमीचेच झाले आहेत. पूर आले की त्यानंतर आपण असे का झाले याची वायफळ चर्चा तशी नेहमीच करतो. पण, कधी तरी या नद्यांच्याही मुळाशी जाऊन त्यांचे वाहणे समजून घ्यायला हवे; त्या मागचे विज्ञान आपण समजून घेतले तर नद्यांच्या पुरांना अटकाव करण्याचे मार्गही सहज आपल्या ध्यानात येतील. नद्यांची पात्रं आपण आक्रसून टाकली आहेत, अतिक्रमणांनी आणि पूर आला की नद्यांवर तर कधी निसर्गावर आरोप करून आपण मोकळे होते. पण, निसर्ग हा नेहमीच नैसर्गिक मार्गाने जातो. मुंबईतील नद्यांची आणि त्यांनी समृद्ध केलेल्या या मुंबईची कथा समजून घेऊयात.

हेही वाचा >> आदिमानवाच्या काळातही ‘मुंबई’ शहरात होते कारखाने! काय आहे मुंबई अन् अश्मयुगाचा संबंध जाणून घ्या

मुंबईतील या नद्या नेहमी नागमोडीच का वाहतात?

सुरुवातीला हे समजून घेऊयात की, मुंबईतील या नद्या नेहमी नागमोडीच का वाहतात? तर आपल्याला माहितीये नदीचं उगमस्थान हे साधारणत: कोणत्या ना कोणत्या एका डोंगरामध्ये असतं. डोंगरावरून नदी खाली जोरात वाहत येते तेव्हा खाली जे दगड असतात ते फुटतात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात, तर काही दगडांची माती होते. हे पाणी उंचावरून जेव्हा खाली पडते, तेव्हा त्याची दिशा बदलते आणि पाण्याचा प्रवाह हा नागमोडी होतो. त्यामुळे नदीचं पात्र स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. मात्र, मुंबईत याच जागेवर मानवानं अतिक्रमण केलं आहे, घरं बांधली आहेत, झोपडपट्ट्या झाल्या आहेत. वर्षानुवर्षे गाळ न काढल्याने नदी उथळ झाली होती आणि हेच कारण आहे की, मुंबईतील दहिसर नदी असेल, ओशिवरा नदी असेल, पोयसर नदी असेल किंवा मग मिठी नदी असेल या नद्यांना पूर येतो.

पाहा व्हिडीओ

अशी अतिशय रंजक आणि क्वचितच कुणाला माहीत असलेली माहिती लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून समजते.