Bollywood Name History: बॉलीवूडच्या चित्रपटांचा जगभरात डंका आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना जगभरातील प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर उचलून घेत असतात. त्यामुळेच बॉलीवूडच्या चित्रपटांसह, गाणी, कलाकार, डायलॉगही सुपरहिट होत असतात. दरवर्षी बॉलीवूडचे चित्रपट जगभरात कोट्यावधींची कमाई करताना दिसतात. पण, बॉलीवूड शब्दाला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन, सलमान खान, अनुराग कश्यप अशा अनेक कलाकारांचा विरोध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड म्हणणं अपमानास्पद असल्याचं अनेक कलाकारांना वाटतं.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहांना ‘बॉलीवूड अभिनेते’ म्हणणं अजिबात आवडत नाही. एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, “‘बॉलीवूड’ हा शब्द पाश्चिमात्य माध्यमांनी आमची खिल्ली उडवण्यासाठी वापरला होता आणि आम्ही अजूनही तो वापरतो हे आमच्याच मूर्खपणाचं लक्षण आहे.” तसंच दिवंगत अभिनेते ओम पुरी यांनी म्हटलं होतं, “बॉलीवूड…जेव्हा पाश्चात्य लोक याचा उल्लेख करतात तेव्हा त्याचा अर्थ हिंदी चित्रपट असतो. ते म्हणतात अरे हे तर नाच-गाण्याचे चित्रपट आहेत. त्यामुळे हा अपमानास्पद शब्द आहे; जो माध्यमांनी निर्माण केला आहे.” पण, या हिंदी चित्रपटसृष्टीतील बॉलीवूड नाव कसं पडलं? त्याचा खरा अर्थ काय? हे जाणून घ्या…

‘बॉलीवूड’ नावामागची गोष्ट

सत्यजित रे आणि बिमल रॉय यांसारखे दिग्गज दिग्दर्शक बंगाली चित्रपटसृष्टीतून आले होते. तत्कालीन बंगाल हे अभिनय आणि कलेचं मोठं केंद्रस्थान मानलं जात होतं. ‘आयएमडीबी’च्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये एक टॉलीगंज नावाचा भाग होता; तिथे चित्रपटांचं चित्रकरण होतं असे. म्हणजेच एक प्रकारे ती बंगालची फिल्मसिटी म्हणून प्रसिद्ध होती. याच आधारावर या चित्रपटसृष्टीला टॉलीवूड नाव ठेवण्यात आलं होतं. त्याप्रमाणे हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण बॉम्ब म्हणजेच आताच्या मुंबईत होतं असे. हिंदी चित्रपटसृष्टीचं मुंबई हे केंद्रस्थान होतं. यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीचं नाव बॉलीवूड झालं. बॉलीवूड शब्दातला वूड हा इंग्रजी चित्रपटसृष्टीला संबोधल्या जाणाऱ्या हॉलीवूडवरून घेण्यात आला आहे.

हेही वाचा – हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…

भारतातील पहिला चित्रपट कोणता?

हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा १०० वर्षांहून अधिक जुना आहे. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ नावाचा भारतातील पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता; जो १९१३ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १९३०मध्ये मुंबईत हिंदी चित्रपटांचे एक मोठे साम्राज्य तयार झाले, जे आजही बॉलीवूड म्हणून सुरू आहे. १४ मार्च १९३१ रोजी भारतातील पहिला बोलपट प्रदर्शित झाला; ज्याचं ‘आलम आरा’ असं नाव होतं. अर्देशीर इराणी यांनी हा बोलपट दिग्दर्शित केला होता.

हेही वाचा – Dilip Vengsarkar : दिलीप वेंगसकर ‘आर्मीत’ नसतानाही, त्यांचे सहकारी ‘कर्नल’ का म्हणायचे? जाणून घ्या

जागतिक बॉलीवूड दिन कधी साजरा केला जातो?

हिंदी चित्रपटसृष्टीचे योगदान लक्षात घेऊन दरवर्षी ‘जागतिक बॉलीवूड दिन’ साजरा केला जातो. २४ सप्टेंबरला जगभरात हा दिवस साजरा केला जातो. याशिवाय त्याआधी २० सप्टेंबरला ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा केला जातो. यादिवशी भारतात सर्व चित्रपटगृहात ९९ रुपयांच्या तिकिटात चित्रपट पाहायला मिळतो.