Lokmanya Tilak Punyatithi 2024: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेते लोकमान्य टिळक यांची आज १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे. भारतीय असंतोषाचे जनक समजले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘लाल-बाल-पाल’ या त्रयींमधील एक होते. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी नेते म्हणून ओळखले जात असतं. लोकमान्य टिळक हे अशा नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी कायम भारतात स्वराज्य किंवा स्वराज्याची भावना रुजवली. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले व खंबीर पुरस्कर्ते मानले जातात. त्या काळात त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, असा मराठी भाषेतून नारा दिला. त्यांनी मराठी भाषेतून दिलेला हा नारा खूप प्रसिद्ध झाला. आज आपण लोकमान्य टिळक यांच्या पाकिस्तानशी संबंधित आगळावेगळा एक किस्सा जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानमधल्या ठिकाणाला टिळकांचे नाव कायम

असं अनेकदा होतं की, राज्यकर्ते जातात, नवीन राज्य येतं आणि गोष्टी बदलल्या जातात. म्हणजेच इंग्रज भारतातून निघून गेले आणि त्यानंतर इंग्रजांनी जी नावं दिली होती, ती बदलण्याची लाट सुरू झाली. भारतामध्ये इंग्रजांनी दिलेली नावं आपण बदलली. आपण त्या ठिकाणांना भारतीय नावं दिली आहेत. जसं हे भारतामध्ये झालं, तसंच ते पाकिस्तानातही झालं. पाकिस्तानातही जी वेगवेगळी नावं देण्यात आली होती, ती तेथील सरकारनं किंवा स्थानिक पातळीवरील सरकारनं बदलली. अनेक इंग्रजी नावं होती, ती बदलली. पाकिस्तान मुस्लीम राष्ट्र असल्यामुळे तेथील हिंदू नाव बदलण्यात आलं. पण, तेथील एक नाव असं आहे, जे आजही कायम आहे आणि ते नाव आहे ‘टिळक इन्क्लाईन’. हे टिळक म्हणजे आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. आजही पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातील हैदराबादमधील सर्वांत मध्यवर्ती ठिकाणाला इंग्रजांनी दिलेलं टिळकांचं नाव टिकून आहे. आजही हे ठिकाण ‘टिळक इन्क्लाईन’ म्हणून ओळखलं जातं.

(हे ही वाचा : पुण्यातील गरिबांचे आशास्थान असलेल्या ससून रुग्णालयाला ‘ससून’ हे नाव कसे मिळाले? जाणून घ्या या नावामागची रंजक कथा… )

लोकसत्ताचे सहसंपादक अरविंद गोखले यांनी ‘टिळक पर्व’ नावाचं पुस्तक लिहिलं आणि या संदर्भात संशोधन करताना त्यांच्या हे लक्षात आलं की, आजही पाकिस्तानात हे ठिकाण आहे; ज्याचं नाव आहे ‘टिळक इन्क्लाईन’. मग त्यांनी त्याबाबतची खातरजमा करण्यासाठी पाकिस्तानातील विद्यापीठातील त्यांच्या ओळखीच्या जहिदा रेहमान जाट यांना ईमेल केला आणि त्यांना ‘टिळक इन्क्लाईन’बद्दल विचारलं. त्यांनी गोखले यांना ती माहिती खरी असल्याचं सांगितलं. पाकिस्तानात गांजो नावाची खूप मोठी टेकडी आहे. या टेकडीवर हैदराबाद शहर वसलेलं आहे आणि टिळक इन्क्लाईन हा आज या शहराचा अतिशय महत्त्वाचा मध्यवर्ती भाग आहे.

टिळक इन्क्लाईन हे नाव का पडलं?

१९२० साली बाळ गंगाधर टिळक प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले होते आणि तेथे प्रचंड मोठी सभा झाली. त्या सभेला लाखो लोक उपस्थित होते आणि लोकांनी टिळकांची खूप मोठी मिरवणूक काढली. त्या वेळेला हैदराबादमधील स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असलेल्या अनेक महाविद्यालयांतील तरुणांनी त्या संपूर्ण सभेसाठी स्वयंसेवक म्हणून काम केलं. प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली ही सभा टिळकांनी गाजवली. सभेच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणाचं नाव ‘टिळक इन्क्लाईन’, असं झालं आणि आजही पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला इतकी वर्षं उलटूनही तेथील स्थानिकांनी किंवा सरकारनी ते नाव बदललेलं नाही. हे नाव १९२० मध्ये अस्तित्वात आलं. त्याच्या आधी या ठिकाणाचं नाव ‘टपाल इन्क्लाईन’, असं होतं. त्या भागामध्ये एक महत्त्वाचं टपाल कार्यालय त्या भागात असल्यानं असं नावं देण्यात आलं होतं; पण टिळकांच्या सभेनंतर हे नाव बदलण्यात आलं, अशीही माहिती अरविंद गोखले यांनी मिळवली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City in pakistan is still named after popular bal gangadhar tilak pdb