Blue Colour Connection With Dr BR Ambedkar: दुर्दैवाने, जगभरात आज अनेक रंग विविध धर्म-जातींमध्ये विभागले गेले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण आज, आंबेडकरांचे अनुयायी व निळा रंग हे समीकरण कसे काय जुळून आले, हे जाणून घेणार आहोत. नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी देणारे आणि त्यांच्यात बंधुभाव वाढीस लागावा यासाठी प्रयत्न करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचे बहुतांश फोटो हे निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये चित्रित करण्यात आले आहेत. शिवाय आंबेडकर जयंतीनिमित्त कित्येक वर्षांपासून निळ्या रंगाचे झेंडे, ‘जय भीम’ लिहिलेले झेंडे, फलकसुद्धा तुम्ही पाहिले असतील. आंबेडकर महासभेचे लालजी निर्मल यांनी या निळ्या रंगाच्या मागील खरा अर्थ सांगितला आहे.
काही वर्षांपूर्वी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘दलित मित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हा आंबेडकर महासभेचे लालजी निर्मल यांनी लखनऊमध्ये पीटीआयला निळ्या रंगाविषयी माहिती दिली. “निळा हा आंबेडकरांचा आवडता रंग होता आणि त्यांनी तो रोजच्या जीवनातही वापरला होता.”
निवृत्त आयपीएस अधिकारी आणि आघाडीचे दलित कार्यकर्ते एस. आर. दारापुरी म्हणाले की, निळा हा त्यांचा आवडता रंग होता. तसेच आंबेडकर शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने १९४२ मध्ये फडकवलेल्या पक्षाच्या ध्वजाचा रंगही निळा होता. १९५६ मध्ये जेव्हा पूर्वीचा पक्ष बदलून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली, तेव्हा त्यालाही तोच निळा झेंडा देण्यात आला.
पुढे ते म्हणतात, “निळा हा आकाशाचा रंग आहे, जो विशालता दर्शवतो आणि हीच बाबासाहेबांची दृष्टी होती,” हाच रंग बसपाने स्वीकारला आहे आणि तेव्हापासून दलित मुक्तीशी त्याचा संबंध आला आहे, “बाबासाहेबांचे पुतळे नेहमी निळ्या कोटमध्ये एका हातात संविधान आणि दुसर्या हातात बोट दाखवून पुढे जाण्याचे प्रतीक म्हणून दिसतात.”
अलीकडेच बदाऊन गावात भगव्या जाकीटमध्ये दलित चिन्हाचा ५ फूट उंच पुतळा स्थापित करण्यात आला होता. परंतु हिंदुत्वाशी संबंधित रंग निवडण्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेचच निळ्या रंगात हा पुतळा पुन्हा रंगवण्यात आला.
हे ही वाचा<<Ambedkar Jayanti 2023: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या ‘या’ गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत
आंबेडकरांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांनी सांगितलेला एक किस्सा सांगताना लालजी निर्मल म्हणाले की. केंद्रीय मंत्री म्हणून लखनऊच्या भेटीवर गेले असताना आंबेडकरांनी राजभवनात राहण्यास नकार दिला होता. आपण पुस्तकांपासून वेगळे होऊ शकत नाही असे ते म्हणाले होते. त्यामुळे तत्कालीन राज्यपाल सरोजिनी नायडू यांनी बाबासाहेबांना राजभवनात राहण्याचे निमंत्रण दिले होते, पण बाबासाहेबांनी पुस्तकांसह रेल्वे सलूनमध्ये राहणार असे सांगितले. हे पुस्तक प्रेम पाहता आंबेडकरांच्या बहुतांश फोटोमध्ये हातात पुस्तक किंवा संविधान आवर्जून दाखवले जाते.