मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास म्हटला की अर्थातच आदिमानव ते सध्याचा प्रगत मानव इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास, प्रवासादरम्यान मानवाने स्वतःच्या संरक्षणासाठी, पोटापाण्यासाठी कोणकोणते शोध लावले हे पाहणे फार महत्त्वाचे असते. हे केवळ महत्त्वाचे नसून, अतिशय रंजक असे आहे. मानवाच्या उत्क्रांतीचे तीन महत्त्वाचे टप्पे, कालखंड म्हणजे अश्म्युग, ताम्रयुग आणि लोहयुग. सर्वात पहिले युग म्हणजे अश्मयुग.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नावाप्रमाणेच अश्मयुगात मानव / आदिमानव हा स्वतःच्या रक्षणासाठी दगडांपासून हत्यारे, अवजारे, त्या काळातील जीवनोपयोगी वस्तू तयार करत असे; असे आपण अगदी लहानपणापासून शाळेत शिकत आलो आहोत. मात्र, त्या काळातदेखील मुंबई शहरात, या आदिमानवाचे हत्यार बनवण्याचे ‘कारखाने’ थाटले असल्याची रंजक माहिती तुम्हाला माहीत आहे का? चला मग, आज आपण या दोघांमधील संबंधाची माहिती जाणून घेऊ.

मुंबई शहरात गोराई भागात असणाऱ्या मनौरी किनाऱ्यालगत आदिमानव आणि त्यांच्या दगडी अवजारांचे काही अवशेष / पुरावे २०१७ साली काही पुरातत्वीय शास्त्रज्ञांना सापडले असल्याची माहिती गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून आपल्याला समजते. मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे सेंटर फॉर आर्किओलॉजी, साठ्ये महाविद्यालय आणि इंडिया स्टडी सेंटर हे मुंबईच्या संशोधन प्रकल्पावर काम करत होते. यासाठी त्यांना भारतीय पुरातत्त्व खात्याने [ASI] देखील परवानगी दिली होती. तेव्हा २०१७ साली याच मनौरी किनाऱ्याजवळ अश्म हत्यारांचे पुरावे सापडल्याचे समजते.

हेही वाचा : World penguin day 2024 : पेंग्विन्सदेखील करतात उपवास? जाणून घ्या या समुद्री पक्षांबद्दल रंजक माहिती

सुरुवातीला एक, दोन हत्यारे सापडता-सापडता संशोधकांना अनेक दगडी हत्यारे या ठिकाणी सापडली. त्यामुळे मुंबईतील या भागात त्या अश्मयुगीनकाळी आदिमानवांची ‘हत्यारांची फॅक्टरी’ असल्याचा अंदाज लावला होता. जेव्हा एखाद्या वस्तूची सर्वाधिक गरज निर्माण होते, तेव्हा ती वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते आणि अशा ठिकाणालाच आपण फॅक्टरी असे म्हणू शकतो. मात्र, कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना, अश्मयुगीन काळात आदिमानव हत्यार आणि शस्त्रे कशी बनवत असतील?

अश्मयुगीन मानव हत्यारे कशी बनवत होते?

तर त्याकाळातील मानव, गोल आकाराच्या आणि विशिष्ट पकड असणाऱ्या दगडाचा वापर करत असे. या दगडांना ‘हॅमर स्टोन’ असे म्हटले जाते. या बेसॉल्टिक हॅमर स्टोनचा वापर, मोठे दगड फोडून, त्यांमधून हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे. मात्र, हे दगड फोडण्यासाठीदेखील एक विशिष्ट पद्धत आहे. जो दगड फोडायचा आहे, त्यावर हॅमर स्टोनने ४५ अंशाच्या कोनामध्ये प्रहार केले जातात. असे केल्याने दगड फोडला जातो. आता त्यांना योग्य आकार देण्यासाठी, लहान आकाराच्या हॅमर स्टोनचा उपयोग केला जातो. अशा पद्धतींचा अभ्यास करून, संशोधकांना तयार झालेली हत्यारे मानवनिर्मित आहेत की नाही हे समजण्यास मदत होते. तसेच ते कसे तयार केले गेले आहेत तेसुद्धा त्यांना समजते.

असे हे हॅमर स्टोन, हत्यारे बनवण्याची अवजारे मनौरीच्या वनडोंगरी भागात भरपूर प्रमाणात सापडत असल्याने संशोधक या जागेला अश्मयुगातील फॅक्टरी साईट म्हणतात. तोसाबंता पधान [Tosabanta Padhan] या पुरातत्त्व शास्त्रज्ञाचा अभ्यासाचा मुख्य विषय हा अश्मयुगीन हत्यारे असा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मनौरी भागात हे प्रायोगिक उत्खनन करण्यात आले होते. तेव्हा तिथे सापडलेली हत्यारे लॅबमध्ये नेऊन त्यावर अभ्यास केल्यावर असे समजले की, मुंबईतील मनौरी भागात सापडलेली ही हत्यारे ‘मध्याश्म’ युगातील होती. म्हणजे साधारणतः १७ हजार वर्षे जुनी.

हेही वाचा : ‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…

याव्यतिरिक्त एकोणीसशेच्या काळात, कर्नल टोड यांनीदेखील या हत्यारांचा शोध घेतला होता. तेव्हा त्यांना मनौरी, मढ, गोराई यांसारख्या ठिकाणी अश्म हत्यारांचे अवशेष सापडले होते. हत्यारं आणि शस्त्रांव्यतिरिक्त चौथ्या आणि पाचव्या शतकातील रोमन साम्राज्यातील वाईन साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भांड्यांचे अवशेषदेखील याच मनौरीमध्ये सापडले आहेत.

व्हिडीओ पाहा :

अशी अतिशय रंजक आणि क्वचितच कुणाला माहीत असलेली माहिती लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून समजते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historic connection between mumbai and stone age man know more facts about this city in marathi dha
First published on: 13-05-2024 at 18:25 IST