पुणे शहर म्हटले की, शनिवार वाडा, वेगवेगळ्या पेठा, मानाचे गणपती अशा विविध गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. इतर शहरांप्रमाणेच पुणेदेखील वेगाने प्रगती करीत आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये आता मेट्रो सेवासुद्धा सुरू झाली आहे. परंतु, पुण्यातील मनपा या भागामध्ये असंख्य प्रवाशांच्या दिवस-रात्र सेवेसाठी सध्या जिथे मोठे बसस्थानक उभे आहे, तिथे काही वर्षांपूर्वी एक सुंदर तलाव आणि उद्यान होते, असे सांगितले, तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. आज आपण काळाच्या थोडे मागे जाऊन, मनपा बसस्थानकाऐवजी तिथे बांधण्यात आलेल्या तलाव आणि उद्यानाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

भांबुर्डा ते शिवाजीनगर

पुण्यामध्ये मुंबईसारखेच ‘पूर्व-पश्चिम’ न म्हणता, नदीच्या अलीकडे आणि पलीकडे, असे म्हटले जाते. त्यानुसार पूर्वीच्या काळी नदीच्या पलीकडील भागास ‘कसबा पुणे’, असे म्हटले जायचे. मात्र, जसजशी लोकसंख्या वाढू लागली, तसतशी या शहरातील वस्तीदेखील वाढत गेली आणि नदीच्या अलीकडेदेखील लोकांनी आपली वस्ती वाढविण्यास सुरुवात केली. आता नवीन आणि वाढत्या वस्तीमुळे नदीच्या अलीकडील भागामध्ये एक नवीन उपनगर उदयास आले. त्या उपनगराचे मूळ नाव होते ते म्हणजे ‘भांबुर्डा’.

हेही वाचा : Earworms songs : ‘आय हाय ओय होय, बदो बदी’, ‘गुलाबी साडी’ अशी गाणी डोक्यात का अडकतात? जाणून घ्या

कसबा पुणे आणि भांबुर्डा या दोन भागांना जोडणारे सुरुवातीला एकूण तीन पूल होते. त्यामध्ये लाकडी पूल, कुंभारवेशीचा दगडी पूल व संगमावरचा पूल यांचा समावेश होता. मात्र नंतर १९२४ साली शनिवार वाड्यासमोरून जाणारा मजबूत व प्रशस्त असा ‘लॉइड ब्रिज’ बांधण्यात आला होता. हा लॉइड ब्रिज पुढे ‘नवा पूल’ म्हणूनदेखील ओळखला जाऊ लागला. कालानुरूप शहराची प्रगती होऊ लागली आणि भांबुर्ड्याचे नाव बदलून, ते ‘शिवाजीनगर’ असे करण्यात आले. आता शिवाजीनगरचा गावठाण भाग वगळता बाकी सर्व परिसरात उच्चभ्रू वर्गातील समाज राहत असे.

मनपा भागातील जलतरण तलाव आणि उद्यान

या उच्चभ्रू वर्गातील लोकांच्या उंची आवडी-निवडी, राहणीमान यांमुळे उद्याने, जलतरण तलाव, नवे पूल परिसराच्या जवळपास असावेत असे विचार शिवाजीनगर भागात रुजू लागले होते. हळूहळू लोकांच्या मनातील जलतरणाची कल्पना पुणे महानगरपालिकेपर्यंत पोहोचली आणि त्यांनी ती सत्यातदेखील उतरवली. १९४५ साली शिवाजीनगरच्या दक्षिण भागात आणि मुळा-मुठाच्या किनाऱ्यावर पुणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी एक जलतरण तलाव बांधला. आता शिवाजीनगरच्या दक्षिण भागात आणि मुळा-मुठाच्या किनाऱ्यावर म्हणजे नेमके कुठे? सोप्या भाषेत सांगायचे, तर सध्या उभ्या असणाऱ्या ‘पुणे महानगरपालिकेच्या इमारती’च्या जागी हा जलतरण तलाव उभारण्यात आला होता. या तलावाला ‘शिवाजी तलाव’, असे नाव देण्यात आले होते. १०० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद असणाऱ्या या तलावात स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी सोय करण्यात आली होती. तर, पोहणाऱ्यांची काळजी घेण्यासाठी दोन जीवरक्षकदेखील २४ तास तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा : पांडवांनीही दिली होती पुण्यातील ‘पाताळेश्वर लेणी’ला भेट! काय आहे या लेणीचा इतिहास जाणून घ्या…

या तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला त्या काळी केवळ सहा पैसे भरावे लागत असत; तर महिन्याचा पास हा केवळ दीड रुपयामध्ये मिळत असल्याची माहिती लोकसत्ताच्या गोष्ट पुण्याची या यूट्यूब मालिकेमधून मिळते. जलतरण तलावाचे नागरिकांमधील आकर्षण आणि त्यांचा प्रतिसाद पाहून, तलावाच्या बाजूला एखादे उद्यान असावे, या विचाराने ‘शिवाजी उद्यान’ बांधण्यात आले. इतकेच नाही, तर त्या उद्यानाच्या बाजूला एक कुस्तीचा आखाडाही बांधण्यात आला होता आणि त्याचेही नाव शिवाजी आखाडा, असे ठेवले गेले होते. या आखाड्याची खासियत सांगायची झाली तर, त्या काळी तब्बल १५ हजार प्रेक्षक बसू शकतील इतका तो भव्य आखाडा होता.

पुण्यातील १९६१ सालचा पूर

सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, १२ जुलै १९६१ साली पुण्यामधील पानशेतचे धरण फुटून पुणे शहराला पुराचा सामना करावा लागला. या पुरामध्ये पुण्याचे प्रचंड नुकसान झाले. मुळा-मुठा नदीच्या दोन्हीही किनाऱ्यांसह जंगली महाराज रोडवर असणाऱ्या संभाजी उद्यानाचेही खूप नुकसान झाले होते. गाळाने मुळा-मुठा परिसर अक्षरशः भरून गेला होता. कालांतराने पुणे शहर पुरातून सावरले. मात्र, शिवाजी जलतरण तलाव, उद्यान व आखाडा हे सर्व पुन्हा काही उभे राहू शकले नाही. आखाडा आणि उद्यानाच्या जागेवर सध्याची पुणे महानगरपालिकेची प्रशस्त, अशी इमारत बांधली गेली. तर, जलतरण तलावाची जागा ही ‘PMT’ म्हणजेच पुण्याच्या बसस्थानक आणि बस आगाराने घेतली. नुकत्याच काही काळापूर्वी या ठिकाणी पीएमसी हे मेट्रो स्थानकही उभारण्यात आले आहे.

स्वतःच्या शहराची झपाट्याने होणारी प्रगती पाहताना कधी कधी त्याच शहराचा इतिहास ऐकायला आणि वाचायला नक्कीच रंजक वाटतो. तुम्हाला शिवाजी तलाव, शिवाजी उद्यान व शिवाजी आखाडा यांच्याबद्दल माहीत होते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.