Mumbai Video : मुंबई शहरात आणि शहराच्या आजूबाजूला अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. पण, तुम्हाला मुंबईतील सर्वांत जुने तीर्थक्षेत्र माहितीये? मुंबईतील सर्वांत जुने तीर्थक्षेत्र म्हणून बाणगंगा हे ठिकाण ओळखले जाते. या बाणगंगेचा इतिहास काय आहे? गोष्ट मुंबईची या ‘लोकसत्ता’ विशेष मालिकेत या जागेविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे.

बाणगंगेची निर्मिती कशी झाली?

एका आख्यायिकेनुसार, “प्रभू रामचंद्र जेव्हा एका ठिकाणी आले, तेव्हा त्या भागामध्ये पिण्यासाठी पाणी नव्हते. पाण्याचा अभाव होता. सगळीकडे समुद्र असल्यामुळे समुद्राचे खारट पाणी पिणे शक्य नव्हते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रामाने जमिनीमध्ये बाण मारला. ज्या ठिकाणी बाण मारला, ती जागा म्हणजे बाणगंगा. प्रभू रामचंद्रानी बाण मारल्यानंतर गंगा प्रकट झाली. येथील मोठ्या कुंडामध्ये गंगा येते.” त्यामुळे या कुंडाला बाणगंगा, असे म्हणतात.
मुंबई शहराच्या दक्षिण मुंबई परिसरात मलबार हिलशेजारील वाळकेश्वर भागात या बाणगंगेचे कुंड आहे.

हेही वाचा : आता मोबाईलवरूनही करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज; प्रक्रिया काय? जाणून घ्या…

पाहा व्हिडीओ

बाणगंगेची वैशिष्ट्ये

असे म्हणतात की, बाणगंगा ही मुंबईतील सर्वांत जुनी वस्ती आहे. या कुंडाच्या शेजारी पायऱ्या आहेत. जेव्हा शिलाहार राजवटीमध्ये वाळकेश्वर हे स्थळ बांधले गेले, तेव्हा बाराव्या शतकात या पायऱ्या बांधल्या गेल्या. या पायऱ्यांचे वैशिष्ट्य असे, की दर चार पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी आपल्याला दिसते. कारण- काय तर ही धार्मिक वास्तू आहे. मोठ्या पायरीवर लोक पिंडदानाचे विधी करतात. गंगा नदी असल्यामुळे लोक शेवटची कार्ये, अस्थी विसर्जन इत्यादी गोष्टी येथे करतात.

कुंडाच्या मध्यभागी एक खांब दिसतो; जिथे भगव्या रंगाचे वस्त्र बांधले आहे. त्याला मेरू म्हणतात; जो पर्वत समुद्रमंथनामध्ये वापरण्यात आला. त्याचे हे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही या मेरूभोवती परिक्रमा करता, तेव्हा तुम्ही कैलास पर्वताभोवती परिक्रमा करता, अशी लोकांची धारणा आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कुठे कराल अर्ज? पात्र कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

शास्त्रज्ज्ञ काय सांगतात…

शास्त्रज्ज्ञांच्या मते, “मुंबईचा जन्म एका ज्वालामुखीतून झाला आणि मुंबईत ज्या पर्वतरांगा दिसतात, त्या एका लाव्हारसाच्या लाटेतून आलेल्या आहेत. जेव्हा लाव्हा आला आणि ज्या ठिकाणी हा लाव्हा खचला, तिकडे पाणी जमा झाले. तोच हा जिवंत झरा आहे; जिथे पाणी एकत्रित येते, त्याला आपण बाणगंगा, असे संबोधतो.