महाभारत महाकाव्य असले तरी हे काव्य भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. महाभारताच्या युद्धाची कारणमीमांसा नेहमी धर्म-अधर्म, कर्म, नीतिमत्ता यांसारख्या मूल्यांच्या आधारे केली जाते. महाभारतातील लढा सत्य-असत्य यांच्यातील संघर्ष असल्याचे कथांच्या माध्यमातून व्यक्त केले जाते. या युद्धातील दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे पांडव आणि कौरव. पांडवांची बाजू सत्याची होती, तर कौरवांची बाजू असत्याची. याच पार्श्वभूमीवर पांडव आणि कौरव हा लढा झाला, असे पारंपरिक कथांच्या माध्यमातून सांगितले जाते. हे परंपरागत चालत आलेले सत्य असले तरी संगीथ व्हर्गीस आणि झॅक संगीथ या दोन अभ्यासकांनी महाभारताच्या युद्धाच्या संदर्भात एक नवीन संशोधन पेंग्विन इंडिया प्रकाशनाच्या ‘हिडन हिस्ट्रीज’ या पुस्तकात मांडले आहे. यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण लेख नुकताच ‘द प्रिंट’ या वृत्त-संकेतस्थळावर प्रकशित करण्यात आला. त्यानिमित्ताने या नवीन संशोधनानुसार महाभारताचे युद्ध नेमके कोणामुळे झाले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युद्धाचे मूळ द्रोणाचार्य आणि द्रुपद राजाच्या संघर्षात

द्रोण आणि द्रुपद राजा यांच्यातील संघर्षाची कथा सर्वश्रुत आहे. झालेल्या अपमानाची परत फेड करण्यासाठी द्रोणाचार्यांनी कुरु साम्राज्याची मदत घेतली होती. कुरु म्हणजे कौरव आणि पांडवांचा मूळ वंश. ज्यावेळी कौरव आणि पांडव यांचे शिक्षण पूर्ण झाले त्यावेळेस द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाचे राज्य मागितले होते. या विचित्र गुरुदक्षिणेचे सुरुवातीला भीष्माचार्यांना आश्चर्य वाटले. तरी त्यांना यात बलाढ्य पांचाल राज्याच्या राजाला म्हणजेच त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांला आपल्या छत्र छायेखाली आणण्याची संधी लक्षात आली.

भीष्म आणि द्रोणांनी द्रुपदाविरोधात व्यूहरचना रचली. त्यामुळे कुरुवंशाच्या त्या तरुण राजपुत्रांनी पांचाल राजा द्रुपदाचा पराभव केला. या पराभवामुळे द्रुपदाचे राज्य दोन भागांमध्ये विभागले गेले. या राज्याचा दक्षिणेकडचा भाग द्रुपदाला मिळाला, तर उत्तरेकडचा भाग द्रोणाचार्यांकडे आला, जो कुरु शासकांच्या अधीन होता. गंगेच्या खोऱ्यातील सत्तेचे केंद्र, पांचाल राज्याने पिढ्यानपिढ्या त्यांच्या वंशाकडे ठेवले होते, या पराभवामुळे ते त्यांच्या सर्वात कट्टर शत्रू कुरू राज्याकडे आले, तेही अत्यंत लज्जास्पद रीतीने. त्यामुळे महाभारताच्या युद्धाचे खरे कारण या द्रुपद विरुद्ध द्रोण संघर्षात असल्याचे नवीन संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा : एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

एका दुधाच्या पेल्याने ठरविले राज्याचे भविष्य

द्रुपदाने द्रोणाचार्यांचा अपमान केला होता. त्याच वेळी द्रोणाचार्यांनी द्रुपदाने केलेल्या अपमानाची परतफेड करण्याचे ठरविले. आणि त्यांनी आपला शब्द तंतोतंत पळाला. परंतु यामुळे राज्यांच्या सीमा बदलल्या. या मानापमानाच्या संघर्षाला कारणीभूत ठरली एक साधी घटना, ती म्हणजे दुधाच्या पेल्याची! द्रोणाचा मुलगा अश्वथामा लहान असताना त्याला गायीचे दूध पिण्याची इच्छा झाली होती. पण द्रोण हे गरीब होते, त्यांना गाय पाळणे शक्य नव्हते आणि आपल्या मुलाला दूध म्हणून तांदळाचे पीठमिश्रित पाणी पिताना पाहून त्यांचे मन दु:खी झाले. यावर मार्ग म्हणून त्यांनी आपला बालपणीचा मित्र आणि तत्कालीन पांचालनरेश द्रुपद यांच्याकडे धाव घेतली. परंतु द्रुपदाने त्यांची मागणी धुडकावून लावली. यामुळे द्रोण दुखावले गेले आणि त्याच वेळी आपल्या अपमानाचा बदला घेण्याचे त्यांनी ठरविले. आणि येथूनच घटनांची साखळी सुरू झाली. ज्यामुळे बलाढ्य राज्यांचा नाश झाला आणि राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासाची पुनर्रचना झाली.

कुरु आणि द्रोणाचार्य यांच्याकडून झालेल्या अपमानाची परतफेड करण्यासाठी द्रुपदाने पांडवांची निवड केली. द्रुपदानेही झालेल्या अपमानाची परतफेड करण्याच्या उद्देशाने यज्ञ करून दोन दैवी मुलांना मागून घेतले. कौरव आणि पांडव यांच्यातील शत्रुत्त्वामुळे द्रुपदाला समोर एक संधीच दिसली, त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने अर्जुनावर लक्ष केंद्रित केले; जो तरुण, शूर धनुर्धर होता, ज्याच्या पराक्रम द्रुपदाने स्वतः रणांगणावर वैयक्तिकरित्या अनुभवाला होता, किंबहुना अर्जुनानेच त्याचा पराभव केला होता. द्रुपदाने विचार केला की, तो अर्जुनाला आपल्या बाजूने जिंकू शकला तर त्याला पुन्हा सत्तेचा तराजू स्वतःच्या बाजूने झुकवण्याची मोठी संधी होती.

जसजशी त्याची मुलं मोठी होत गेली, तसतसे द्रुपदाला समजले की त्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे द्रौपदीसाठी वराची निवड करण्याच्या उद्देशाने त्याने एक सुनियोजित योजना आखली. तिच्यासाठी अर्जुनाचीच वर म्हणून निवड केली. अर्जुन हा पांडवांचा फक्त तिसरा भाऊ असल्याने, द्रौपदीच्या मुलांना कुरू राज्याचा वारसा मिळण्याची शक्यता फारच कमी होती, त्यामुळे द्रौपदीचे लग्न सर्व भावांशी होणे गरजेचे होते, तर द्रुपदाच्या एका नातवाला कुरु सिंहासनावर बसण्याची संधीही मिळाली असती आणि झालेही तसेच. द्रौपदीचा विवाह पाच पांडवांशी झाला, परंतु दुर्दैव असे की तिचा एकही पुत्र सिंहासनावर बसला नाही.

महाभारत हे कुरु-पांडव युद्ध नाही, तर पांचाल-कुरु युद्ध आहे

महाभारताच्या युद्धासाठी हजारो प्राणांची आहुती द्यावी लागली, तरी द्रुपदाने युद्धात जाण्यास मागेपुढे पहिले नाही. द्रुपदाने आनंदाने सर्व जोखीम स्वीकारल्या-आपल्या सर्व पुत्रांना आणि नातवंडांना रणांगणावर उतरवून, त्यांच्या मालकीच्या राज्यांसह सर्व लष्करी संसाधने समर्पित केली. इतकेच नाही तर आपल्या मुलाला पांडवांचा सर्वोच्च सेनापती म्हणून नियुक्त केले.

कारण प्रत्यक्षात हे युद्ध पांडव आणि कौरवांमधील युद्ध नव्हते, तर कुरु आणि पांचाल या महान राज्यांमधील युद्ध होते. इतर सर्व महाजनपदे कुरु किंवा पांचाल यापैकी एकाचे सहयोगी म्हणून युद्धात सामील झाले, कारण हे युद्ध भारतात गंगेच्या खोऱ्यातील त्यांचे अस्तित्व पुन्हा सिद्ध करणारे होते.

अधिक वाचा : Krishna Janmashtami 2023: विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?

पांचलांनी युद्ध जिंकले पण त्यांचा राजा हरला

दुर्दैवाने, युद्धाचा परिणाम विजेत्यासाठी शाप ठरला. पांचाल आणि पांडव शेवटी विजयी झाले, तरी त्यांचे नुकसान फार मोठे होते. द्रोण, कर्ण आणि अश्वथामा या कुरु सेनापतींनी द्रुपदाचे पुत्र आणि नातवंडे यांना ठार केले. पंधराव्या दिवशी द्रोणांनी स्वतः राजा द्रुपदाचा वध केला. पांचाल राज्याच्या संकटात भर घालण्यासाठी, युद्धाच्या शेवटच्या दिवशी, अश्वथामाने रात्री पांडवांच्या छावणीवर हल्ला केला आणि त्यास आग लावली.

मारले गेलेल्यांमध्ये दृष्टीदम्न, शिखंडी आणि द्रौपदीची मुले यांचा समावेश होता, जे सर्व सिंहासनावर बसले असते आणि द्रुपदाची जागा घेऊ शकले असते. त्यामुळे, प्रत्यक्षात, विजयासाठी खूप उत्कंठा ठेवल्यानंतरही, पांचालांचे राज्य त्यांच्या स्वत:च्या वारसदाराला मिळाले नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not pandavas or kauravas but this was the cause of mahabharata war svs
Show comments