लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत २८ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय म्हणजे अहमदनगर या शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव या शहराला दिलं जावं हा प्रस्ताव दोन वर्षांपासून समोर येत होताच. निवडणुकीच्या तोंडावर या नामांतरला संमती देण्यात आली आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा. आपण जाणून घेऊ आता अहिल्यानगर झालेल्या अहमदनगरचा इतिहास काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे अहमदनगरचा इतिहास?

अहमदनगर हे शहर पश्चिम महाराष्ट्रात आहे. जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटनुसार या शहराचा उल्लेख २४० इ.स. पूर्व काळात म्हणजेच मौर्य सम्राट अशोकाच्या काळातही आढळतो. मध्ययुगीन इतिहास लक्षात घेतला तर राष्ट्रकुट, चालुक्य आणि त्यानंतर दिल्ली यांनी या प्रदेशावर राज्य केलं. दिल्लीचं वर्चस्व जेव्हा आलं तेव्हा अफगाण सैनिक अल्लाउद्दीन हसन गंगूने बंड पुकारलं. या बंडामुळे दख्खन प्रांतात बहामनी राज्याची स्थापना झाली. काही काळानंतर अहमदनगर (जे तेव्हा निजामशाही म्हणून ओळखले जायचे) त्या साम्राज्यातून उदयास आलेल्या पाच राज्यांपैकी एक झालं.

मे १४९० मध्ये काय घडलं?

इ.स. १४८६ मध्ये मलिक अहमद हा निजामशाह बहामनी राज्याच्या ‘पंतप्रधान’ या पदावर बसला. राजाने त्याला सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तो आपल्या कौशल्याने हाणून पाडला. मे १४९० या वर्षात त्याने अहमदनगरजवळ बहामनी राज्याच्या सैन्याचा पराभव केला. १४९४ मध्ये त्याने एक शहर वसवलं जे सीना नदीच्या किनाऱ्यावर होतं. त्यानंतर या शहराला मलिक अहमदने स्वतःचं नाव दिलं जे होतं अहमदनगर.

हे पण वाचा- अहमदनगरला ज्यांचं नाव दिलं त्या ‘अहिल्याबाईं’चं जाणून घ्या योगदान!

यानंतर मलिक अहमद निजामशहाने दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला आणि आपलं सैन्य त्या ठिकाणी तैनात केलं. त्यानंतर आपल्या वर्तनाने त्याने परदेशातून आलेले मुस्लिम, स्थानिक मुस्लिम यांची मनं जिंकली. एवढंच नाही तर मराठा शेतकरी आणि ब्राह्मण समाजाचा विश्वासही त्याच्यावर बसला. निजामशहाने ब्राह्मण समाजाचा विश्वास जिंकल्याने हिंदूंची मनं वळवण्यातही त्याला यश आलं. भारताचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात पंडितजी लिहितात, “१४९० मध्ये अहमदनगरचा संस्थापक असलेला अहमद निजामशाह हा बहामनी राजाचा मंत्री असलेल्या निजाम उल-मुल्क भैरी यांचा मुलगा होता.”

अहमदनगर शहराची स्थापना २८ मे १४९० रोजी मलिक अहमद बादशहाने केली. मागील वर्षीच्या मे महिन्यात अहमदनगर शहराच्या स्थापनेला ५३३ वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले होते. जे आता बदलण्यात आले आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now ahilyanagar but know about the history of the ahmednagar name scj
Show comments