Wrestling history: अलीकडेच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजन गटातून अंतिम फेरी गाठलेली भारताची विनेश फोगट हिचे वजन अधिक भरल्यामुळे ती अपात्र ठरली होती. पहिल्याच फेरीत गतविजेत्या सुसाकीला हरवून विनेशने सनसनाटी सुरुवात करून पुढे आणखी दोन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जिंकून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीपूर्वी सकाळी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत तिचे वजन अधिक भरल्याने विनेशला अपात्र ठरविण्यात आले. अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत विनेशचे वजन १०० ते १५० ग्रॅम अधिक भरल्याचे समोर आले.

५० किलो वजनी गटात अंतिम तसेच कोणत्याही लढतीपूर्वी स्पर्धक मल्लाचे वजन ५० किलोंपेक्षा अधिक भरणे नियमबाह्य ठरते, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर भारतात अनेक घडामोडी झाल्या आणि त्यावर राजकारणही रंगले. हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थोडक्यासाठी बाद झालेल्या विनेशने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता काँग्रेसने जुलाना विधानसभा मतदारसंघातून तिला उमेदवारी जाहीर केली आहे. एकूणच सध्या कुस्तीने मातीच्या मैदानातून थेट राजकारणाच्या डावपेचात उडी मारली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘कुस्ती’ आणि तिच्या ‘पेहलवानां’चा इतिहास नेमका काय सांगतो हे समजून घेणं नक्कीच माहितीपूर्ण ठरावं!

अधिक वाचा: Women’s Wrestling: रक्त, घाम आणि अश्रूंचा प्रवास! महिला कुस्तीपटूंची ३ दशकांची संघर्षगाथा

कुस्तीचे जागतिक इतिहासातील संदर्भ

कुस्ती या खेळाचा उगम नेमका कुठे झाला याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. हा खेळ भारतात आधी खेळला गेला की, इतरत्र कुठे याचा निर्णय घेण्यासाठी मर्यादित पुरावे उपलब्ध आहेत. इजिप्तमधील बेनी हसन समाधीच्या भिंतीवरील चित्रांमध्ये कुस्तीचे सर्वात जुने चित्रण सापडते. हे चित्रण सुमारे इसवी सनपूर्व २१०० मधील आहे. विशेष म्हणजे कुस्तीचा आणि तिथला संबंध असल्याचे पुरावे काही नावांमधून देखील मिळतात. पहलवान (कुस्तीपटू) हा शब्द इराणमधील पार्थियन जमातीच्या नावावरून ‘पहलवा’ (सनपूर्व २५०) वरून आला आहे. कुश्ती हा शब्द मूळ फारसी भाषेतील आहे. ग्रीक साहित्य आणि ऐतिहासिक नोंदी देखील प्राचीन ग्रीसमधील कुस्तीची समृद्ध परंपरा उलगडतात.

कुस्तीचा भारतातील इतिहास

भारतात कुस्तीची ऐतिहासिक पाळेमुळे रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांमध्ये दिसून येतात. राजाच्या शारीरिक पराक्रमाचा राज्याच्या कल्याणाशी संबंध असल्यामुळे कुस्ती राजघराण्यांतील प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग होता. १२ व्या शतकातील मानसोल्लास हा ग्रंथ चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा याच्या दरबारातील शाही कुस्तीचा प्रारंभिक संदर्भ देतो. बाबरनामा आणि अकबरनामा सारख्या मुघल नोंदी पारंपारिक उत्तर भारतीय मल्ल-युद्धाची (लढाऊ-कुस्ती) वर्णने करतात, ज्यात पर्शियन तंत्रांचा समावेश आहे. आजच्या भारतीय कुस्तीत पारंपारिक हिंदू तंत्रांसह मुघलांनी सादर केलेल्या पर्शियन शैलीचे मिश्रण आहे.

अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?

ब्रिटिशांचा विरोध

सुरुवातीला इंग्रजांनी या खेळाचे स्वागत केले, मात्र नंतर स्वातंत्र्यलढ्यात हा खेळ राष्ट्रवादी प्रतिकाराचे प्रतीक ठरल्यावर त्यांनी आक्षेप घेतला. या खेळ राष्ट्रवादी प्रतीक ठरण्यासाठी बंगालमधील सरला देबी या कारणीभूत ठरल्या होत्या. टागोरांच्या भाची सरला देबी यांनी बंगाली जनतेला ब्रिटीश वर्चस्वाचा सामना करण्यासाठी कुस्तीचा वापर करण्याचे आवाहन करणारी पत्रके लिहिली. त्यामुळे हा खेळ आपल्यासाठी विरोधक निर्माण करतो म्हणून ब्रिटिशांनी या खेळाला विरोध दर्शवला होता.

एकुणातच भारतीय कुस्तीने अनेक आव्हाने पार केली आहेत आणि ती आजही आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. या परंपरेचा सन्मान राखणे आणि पुढच्या पिढ्यांना या वारशाचे महत्त्व पटवून देणे अत्यावश्यक आहे