आपल्या प्रत्येकाचे रोजचे जीवन तंत्रज्ञान आणि गॅझेट्सवर अवलंबून आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या गॅझेट्सचा वापर करतो.यामुळे स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर आजकाल खूप वाढला आहे. अनेकांचे या गॅझेट्सशिवाय काही तास जगणे फार कठीण आहे. काही लोकं तर या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून काही मिनिटांसाठीही दूर राहू शकत नाहीत. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे संध्याकाळी सायरन वाजताच लोक २ तास स्वत:ला स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवतात. म्हणजे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स ते पूर्णपणे बंद करून ठेवतात.

सायरन वाजतात गावातील इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स होतात बंद

आजकाल लॅपटॉप, स्मार्टफोन यांसारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स मोठ्याप्रमाणात वापरली जातात. कारण या गॅझेट्समुळे आपले जीवन खूप सोप्पे झाले आहे. पण यामुळे आपल्याला अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. पण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मोहितांचे वडदगाव येथे दररोज संध्याकाळी ७ वाजता एक सायरन वाजतो. सायरनचा आवाज ऐकून ग्रामस्थ दीड तासांहून जास्त वेळ आपला मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेटसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स बंद करतात. एवढेच नाही तर गावातील काही लोक घरोघरी जाऊन कोणी गॅझेट्सचा वापर तर करत नाहीत ना याची तपासणी करतात. या प्रक्रियेला डिजिटल डिटॉक्स असे म्हणतात.

लोक डिजिटल जगापासून होतात दूर

डिजिटल डिटॉक्स प्रक्रियेअंतर्गत लोक डिजिटल जगापासून पूर्णपणे दूर गेले आहेत. या काळात लोक सोशल मीडियापासून सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून पूर्णपणे दूर राहतात. डिजिटल डिटॉक्स कालावधीत लोक कॉम्प्युटर, स्मार्टफोन, सोशल मीडिया वापरत नाहीत.

गावातील सरपंचाची कल्पना

मीडिया रिपोर्टनुसार, गावाच्या डिजिटल डिटॉक्सची ही अनोखी कल्पना गावचे सरपंच विजय मोहिते यांची आहे. कोरोनादरम्यानच्या लॉकडाऊनच्या काळात बहुतेक लोकांना या इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचे व्यसन लागले होते. पण लॉकडाऊन संपला तरी लोकांमध्ये हे व्यसन जसेच्या तसे राहिले. परंतु लोकांना या व्यवसनापासून दूर करण्यासाठी डिजिटल डिटॉक्सची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ज्यामध्ये दररोज सुमारे २ तास कोणीही कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरत नाहीत.