What is Brain Drain Process: भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणजे देशाच्या आर्थिक नाड्यांचं केंद्रस्थानच म्हणता येईल इतकं या शहराचं महत्त्व आहे. त्यामुळे रोजगार किंवा व्यवसाय संधींच्या शोधात फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं. अनेकदा या स्थलांतरामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर परिणाम होऊन ताण निर्माण होतो. त्याविरोधात आंदोलनंही होतात. पण आता मुंबईत नव्हे, तर मुंबईबाहेर स्थलांतर होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण मुंबईत ब्रेन-ड्रेनची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे!

ब्रेन-ड्रेन म्हणजे नेमकं काय?

कोणतंही काम करायचं असल्यास त्या कामासाठीचं कौशल्य व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक असतं. या कौशल्याला शिक्षणाची जोड मिळाली तर ती व्यक्ती म्हणजे त्या राज्यासाठी किंवा व्यापक अर्थाने देशासाठी महत्त्वाची ‘अॅसेट’ होऊन जाते. अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी या व्यक्तीच्या शिक्षण व कौशल्याचा अप्रत्यक्षपणे हातभार लागत असतो. पण काही अपरिहार्य कारणांमुळे, अंतर्गत किंवा बाह्य घटकांमुळे, कौटुंबिक वा आसपासच्या परिस्थितीमुळे अशा कोणत्याही गोष्टीमुळे असं कुशल व सुशिक्षित मनुष्यबळ जर एखाद्या देशातून दुसऱ्या देशात वा एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असेल, तर त्याला ‘ब्रेन ड्रेन’ असं म्हणतात.

ब्रेन ड्रेन प्रक्रियेची कारणं…

१. आर्थिक/रोजगार/व्यवसाय संधी: ब्रेन ड्रेनची स्थिती उद्भवण्यासाठी आर्थिक घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरतात असं दिसून येतं. दुसऱ्या ठिकाणी चांगल्या संधीच्या वा चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने अशा कुशल मनुष्यबळाकडून स्थलांतर केलं जातं.

२. राजकीय अस्थिरता: संबंधित भागामध्ये राजकीय अस्थिरता असल्यास स्थिर आयुष्याच्या शोधात स्थलांतर केलं जातं.

३. शिक्षणव्यवस्था: आपण राहत्या भागामध्ये शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध नसतील किंवा इतर ठिकाणी तुलनेनं चांगल्या दर्जाच्या संधी असतील, तर त्यासाठी स्थलांतर केलं जातं. हे स्थलांतर कुशल मनुष्यबळापेक्षा त्यांच्या अपत्यांच्या दृष्टीने केलं जातं.

Brain Drain: मुंबईत वाढत्या घरभाड्यांमुळे ‘ब्रेन-ड्रेन’ होतंय, लोक कमावतायत कमी आणि भाडी भरतायत जास्त!

मुंबईत नेमकं काय घडतंय?

CREDAI-MCHI च्या ताज्या अहवालानुसार मुंबईत घरांच्या किमती व घरभाड्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. मुंबईतील सामान्य कर्मचारी आपल्या वार्षिक पगारापेक्षाही घरभाड्यासाठी जास्त रक्कम खर्च करू लागल्याचं या संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. परिणामी घरभाडी वाढतच असल्यामुळे कुशल मनुष्यबळ मुंबईतून इतर ठिकाणी परवडणाऱ्या घरांच्या शोधात स्थलांतर करत असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. हे प्रमाण असंच वाढत राहिलं, तर मुंबईतही ब्रेन ड्रेनची स्थिती उद्भवू शकते.

ब्रेन ड्रेनचा शहरावर काय परिणाम होऊ शकतो?

मुंबईसारख्या शहरांसाठी ब्रेन ड्रेनचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे कुशल मनुष्यबळ इतरत्र जाऊ लागतं. त्यामुळे परिणामी इथल्या विद्यमान उद्योगांना हे मनुष्यबळ मिळवण्यात अडचणी येतात. पण त्याचबरोबर, जिथे अशा मनुष्यबळाची कमतरता असते, अशा ठिकाणी नवे उद्योगही उभे राहात नाहीत किंवा मोठ्या कंपन्याही येत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून वाढती बेरोजगारी व त्यातून अर्थव्यवस्थेचा मंदावणारा वेग असं परिणामांचं एक चक्रच सुरू होऊ शकतं.

हेच कुशल मनुष्यबळ रुग्णालये, शिक्षण संस्था किंवा अभियांत्रिकी कामांमध्ये वापरलं जातं. पण त्यांचा अभाव निर्माण झाल्यास सार्वजनिक क्षेत्रात पुरवल्या जाणाऱ्या या सोयीसुविधांवरही परिणाम होऊ शकतो. तसेच, हे मनुष्यबळ तयार करण्यासाठी त्या शहरानं किंवा देशानं गुंतवलेला वेळ व पैसाही निरर्थक ठरतो.