PM Vishwakarma Scheme : देशातील छोट्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकदा केंद्र सरकारद्वारे मदत दिली जाते. त्यासाठी अनेक योजनाही राबवल्या जातात. त्यापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना, या योजनेंतर्गत विश्वकर्मा समाजातील कुशल कामगारांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदराने अर्थसहाय्य दिले जाते. दरम्यान, ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसाठी नेमकं कोण पात्र आहेत? या योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया काय? आणि महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पंतप्रधान विश्वकर्मा ही योजना नेमकी काय?

पंतप्रधान विश्वकर्मा या योजनेची घोषणा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. तसेच त्यासाठी १७ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर १७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील १४० पेक्षा अधिक जातींच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत विश्वकर्मा समाजातील सुतार, लोहार, गवंडी, कुंभार यासह इतर कामगारांना कमी व्याजदरात तीन लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य उपबल्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता.

हेही वाचा – What is a Pager: पेजर म्हणजे काय? लेबनानमध्ये पेजरचा स्फोट कसा काय झाला?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी पात्र कोण?

विश्वकर्मा समाजातील १४० पेक्षा जास्त जातीतील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कामगाराच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत असू नये, तसेच तो करदाता असू नये अशी ही अट घालण्यात आली आहे. ज्या कारागिराच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नाही आणि आयकर भरत नाही, असे कारागीर या योजनेसाठी पात्र ठरतात.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, बँक पासबूक, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, चालू असलेला मोबाईल नंबर, रहिवासी दाखला, तसेच पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र असणं आवश्यक आहे.

हेही वाचा – Aadhar Card Update : लग्नानंतर आधारवरील नाव आणि पत्ता बदलायचाय? जाणून घ्या सोपी पद्धत

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

अर्जदाराला सर्वात आधी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अर्जदाराला एक ओटीपी प्राप्त होईल. मोबाईलवर आलेला ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्ज करता येईल. अर्जाचे पेज ओपन झाल्यानंतर अर्जदाराला नीट संपूर्ण माहिती भरावी लागेल. तसेच आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागेल. त्यानंतर अर्ज दाखल करा, या पर्यायावर क्लिक करून अर्ज सबमिट करता येईल.