What security protocols kick in when a flight gets a bomb threat? : गेल्या आठवड्याभरापासून भारतीय विमान कंपन्यांना बॉम्बच्या ३४ धमक्या मिळाल्या आहेत. आलेल्या या सर्व धमक्या खोट्या असल्या तरीही या धमक्यांमुळे एअरलाईन ऑपरेशन्समध्ये व्यत्यय आला. त्यामुळे साहजिकच प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरक्षा पायाभूत सुविधेवरही प्रचंड ताण आला. त्यामुळे एखाद्या विमान कंपनीला धमकी प्राप्त झाल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने काय पावलं उचलली जातात ते पाहूयात.

धमकी खोटी असली तरीही…

सुरक्षा हे विमान वाहतुकीतील सर्वांत मोठी सुविधा मानली जाते. यामुळे अज्ञात व्यक्ती किंवा विविध सोशल मिडिया खात्याकवरून विमान कंपन्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टार्गेट केलं जातं. एअरलाईन्स आणि यंत्रणांना गोंधळात टाकण्यासाठी किबोर्डवरील काही क्लिक पुरेसे असतात. “आम्हाला माहिती आहे की ९९.९९ टक्के धमक्या बनावट असतात. परंतु, उरलेल्या ०.०१ टक्के प्रकरणात काहीही होऊ शकतं. बोर्डिंगच्या आधी सर्व प्रवाशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केलेली असते. त्यांच्या सामानांचीही कडक तपासणी केली जाते. तरीही आम्ही अशा बॉम्ब धमक्यांना गांभीर्याने घेतो. या धमक्या खोट्या आहेत, हे माहीत असूनही आम्ही धमकी प्राप्त झाल्यावर सर्व उपाययोजना आखतो”, असं नागरी उड्डान मंत्रालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

“जेव्हा विमानाला बॉम्बची धमकी मिळते तेव्हा तपशीलवार सुरक्षा प्रोटोकॉल पाळला जातो. धमकीचा कॉल येताच आम्ही जवळच्या विमानतळावर लँडिग करतो. लँडिंग केल्यानंतर, विमानाची तसेच प्रवाशांच्या बॅगची कसून सुरक्षा तपासणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुरक्षा एजन्सीपासून ते एअरलाइन्स आणि विमानतळ ऑपरेटरपर्यंत अनेक सर्वांचा जवळचा समन्वय असतो. समाधानकारक निष्कर्ष काढण्यासाठी काही तास लागू शकतात”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

हेह वाचा >> Boarding From Left Side : विमानात नेहमी डाव्या बाजूने का चढतात? प्राचीन काळातील ‘हे’ कारण जाणून घ्या!

विशिष्ट बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी

उड्डाण करत असलेल्या विमानात जेव्हा एअरलाईन किंवा विमानतळाकडून धमकी प्राप्त होते, तेव्हा विमानतळ-विशिष्ट बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (BTAC) ची त्वरित बैठक बोलावली जाते. प्रत्येक विमानतळाचे स्वतःचे BTAC असते. यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरो (BCAS), संबंधित विमान कंपनी आणि विमानतळ ऑपरेटर यांचा समावेश असतो. ज्या विमानतळावरून विमान निघाले होते त्या विमानतळावर ही समिती सहसा बोलावली जाते आणि अनेकदा गंतव्यस्थानाच्या विमानतळाच्या BTAC शी जोडली जाते. धमकी मिळाल्यानंतर त्याची वेळ, स्त्रोत या सारख्या निकषांवरूनही ही धमकी खरी आहे की खोटी याची तपासणी केली जाते.

हा धोका विशिष्ट धोका आहे, असं समजल्यावर BTACकडून पुढील हालचाली केल्या जातात. तर, विशिष्ट धोका नसलेल्या प्रकरणात कोणतीही त्वरीत कारवाई केली जात नाही. सरकार आणि एअरलाइन्समधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशिष्ट उड्डाणांना दिलेले बहुतेक धमक्या हे मुख्यतः विशिष्ट धोके म्हणून मानले जातात. यामुळे आवश्यक असलेल्या सर्व नियमांचं पालन केलं जातं.


“समितीच्या निर्णयावर आधारित एटीसी आम्हाला धमकी आणि शिफारस केलेल्या कारवाईबद्दल माहिती देते. ज्या विमानतळावरून आम्ही निघालो त्या विमानतळावर परत जाणे, गंतव्यस्थानाच्या विमानतळाकडे जाणे किंवा परिस्थिती हाताळण्यास सक्षम असलेल्या जवळच्या विमानतळाकडे वळवणे याबाबत निर्णय घेतला जातो”, असे एका वरिष्ठ एअरलाइन पायलटने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

आंतरराष्ट्री प्रवास करणाऱ्या विमानांना धमकी आली तर?

भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडलेल्या आणि बऱ्यापैकी अंतरावर असलेल्या भारतीय विमान कंपनीच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी जेव्हा धमकी मिळते, तेव्हा प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होते. कारण परदेशी ATC, एजन्सी आणि समित्या देखील यामध्ये समाविष्ट होता. या सर्वांचा निर्णय घेऊन कारवाई केली जाते.

उतरल्यावर सुरक्षा तपासणी

मिळालेली बॉम्बेची धमकी विशिष्ट धमकी असल्याचं कळल्यावर सर्व प्रवाशांना जवळच्या विमानतळावर उतरवलं जातं. त्यांची आणि त्यांच्या सामानाची कसून चौकशी केली जाते. प्रवाशांचे सामान, मालवाहू आणि खानपान साहित्य देखील ऑफलोड केले जातात. त्यानंतर रिकाम्या विमानाची एअरलाइन, अभियांत्रिकी आणि सुरक्षा कर्मचारी कसून शोध घेतात. तपासणी आणि स्क्रीनिंगमध्ये इतर उपकरणांसह स्निफर डॉग आणि स्कॅनिंग मशीन यांचाही समावेश असतो.

काहीही संशयास्पद आढळले नाही तर, विमानाचे उड्डाण केले जाते. शोध आणि तपासणी प्रक्रियेत संशयास्पद वस्तू आढळल्यास, त्या ठिकाणी उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि बॉम्ब निकामी पथक आवश्यकतेनुसार सहकार्य करतात. अग्निशामक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर आपत्कालीन प्रतिसाद पथके देखील या दरम्यान सज्ज असतात.

प्रवाशांची गैरसोय, विमान कंपन्यांची गैरसोय

अशा घटनांमुळे सर्व प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया सहसा अत्यंत वेळखाऊ असते, प्रवाशांना एजन्सींकडून सर्व स्पष्ट होईपर्यंत विमानतळावरच अडवून ठेवले जाते. प्रवाशांची लक्षणीय गैरसोय होण्यासोबतच विमान कंपन्यांना मोठा फटका बसतो. यामुळे इतर विमान उड्डाणांना विलंब होतो. काहीवेळा उर्वरित विमान उड्डाण रद्द केले जातात.

जेव्हा विमानांना दुसऱ्या विमानतळावर वळवण्यास भाग पाडले जाते, तेव्हा विमान कंपन्यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो, ज्यामध्ये प्रवाशांसाठी निवास व्यवस्था किंवा पर्यायी उड्डाणे किंवा वाहतूक यांचा समावेश होतो. अनेकदा अशा प्रकरणांमध्ये, क्रूच्या फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन्स (FDTL) देखील विहित मर्यादेपेक्षा जास्त होतात. याचा अर्थ ते अनिवार्य विश्रांतीच्या कालावधीशिवाय फ्लाइट चालवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, विमान कंपन्यांना उड्डाण चालवण्यासाठी इतर क्रूची व्यवस्था करावी लागते.