National Post Day 2023 : रक्षाबंधनासाठी भावाला राखी, गावी राहणाऱ्या भावंडांना मुंबईहून भेटवस्तू, तर दूरच्या नातेवाइकांना लग्नपत्रिका पाठवणे या अनेक गोष्टींसाठी आपण आजही पोस्टाचा उपयोग करतो. शहरात, गावात तुम्ही अनेक ठिकाणी पोस्ट ऑफिस पाहिले असेल. आताच्या संगणक, मोबाईलच्या युगातदेखील कुरिअर सेवेचा वापर करून अनेक जण पत्र किंवा महत्त्वाची कागदपत्रे पाठवतात. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लाल रंगाच्या टपाल पेटीत आपण पत्र टाकतो. मग टपाल कार्यालयात जमा झालेल्या या पत्रांचे विभाजन करून, ती पोस्टमनला घरोघरी वाटण्यासाठी दिली जातात. त्यामुळे सोशल मीडिया ॲपच्या विश्वात आजही टपाल पेटी आणि टपाल कार्यालयाचे तितकेच महत्त्व आहे.’राष्ट्रीय पोस्ट दिवसा’च्या निमित्ताने इंडिया पोस्ट यांच्या माहितीनुसार, आपण ‘टपाल पेटी’ लाल रंगाची का असते? हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय पोस्ट दिवसाची स्थापना :

भारतात १० ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय पोस्ट दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १५० वर्षांहून अधिक काळ भारतीय टपाल विभागाने ही भूमिका बजावली आहे. इंग्रजांनी भारतात टपाल सेवा आणली. लॉर्ड डलहौसीने १८५४ मध्ये याची स्थापना केली.भारतात नऊ पोस्टल झोन, २३ पोस्टल सर्कल आणि एक आर्मी पोस्ट ऑफिस आहे. भारतातील पोस्ट ऑफिस सहा अंकी पिन कोड प्रणाली वापरतात; जी १९७२ मध्ये लागू करण्यात आली होती. पिन कोडमधील प्रत्येक अंकाला विशिष्ट महत्त्व असते. पहिला अंक प्रदेश दर्शवतो, दुसरा उप-प्रदेश, तिसरा जिल्हा चिन्हांकित करतो, तर शेवटचे तीन अंक विशिष्ट पत्त्यावर सेवा देणारे विशिष्ट पोस्ट ऑफिस दर्शवतात. श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी ही संकल्पना मांडली होती.

टपाल पेटीचा (Letter Box) रंग लाल का असतो?

टपाल पेटीचा लाल रंग पोस्टल सेवेच्या प्रतिष्ठित स्वरूपाचा एक भाग आहे. सुरुवातीला ब्रिटिश काळात हिरव्या रंगाची टपाल पेटी असायची. पण हिरव्या रंगाची टपाल पेटी शोधण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी लोकांकडून येऊ लागल्या. त्यामुळे १८७४ च्या सुमारास लाल रंगाच्या टपाल पेटी आणल्या गेल्या. लाल रंग नेहमीच आकर्षित करतो आणि अनेकांचे लक्ष वेधून घेतो. टपाल पेटीकडे सहजपणे अनेकांचे लक्ष जावे यासाठी त्या लाल रंगाच्या करण्यात आल्या आहेत. तसेच टपाल पेटीचा री-पेंटिंगचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी जवळपास १० वर्षे लागली. टपाल पेटी लाल असण्याचे कारण म्हणजे ती दुरून सहज दिसते. मग तेव्हापासून टपाल पेटी लाल रंगात दिसू लागली.

भारतीय टपाल विभाग :

‘राष्ट्रीय पोस्ट दिवस’ हा दिवस १९६९ मध्ये सुरू झाला. त्याच वर्षी पहिला जागतिक पोस्ट दिवस साजरा करण्यात आला. भारतातील पोस्टल सेवेने अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवेमुळे सामाजिक व आर्थिक विकासालाही हातभार लागला. पोस्ट ऑफिसच्या मुख्य कर्तव्यांमध्ये पत्र गोळा करणे, प्रक्रिया करणे, प्रसारित करणे व वितरित करणे यांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय पोस्टल सप्ताह साजरा केला जातो.

हेही वाचा… तुम्हाला हवं तसं घडवण्यासाठी ‘Manifest’ कसं करावं? स्वतः सद्गुरूंनी सांगितला मंत्र

भारतातील पोस्टल स्टॅम्पचे विविध प्रकार कोणते आहेत?

१. स्मारक स्टॅम्प (Commemorative stamps) : एखाद्या स्‍थानी घडलेला प्रसंग, विशिष्ट घटना, एखादी व्‍यक्‍ती किंवा संस्थेचा वर्धापनदिन यांसारख्या तारखा लक्षात ठेवण्यासाठी स्‍मारक स्टॅम्प जारी केला जातो. स्टॅम्पचा विषय सामान्यत: प्रिंट स्वरूपात लिहिला जातो.

२. माय स्टॅम्प (My Stamp) : तिकिटांबरोबरच सामान्य नागरिकांनासुद्धा आपल्या छायाचित्राचे अथवा आपल्या आवडत्या गोष्टीचे टपाल काढता यावे म्हणून टपाल विभागाने ‘माय स्टॅम्प’ ही विशेष योजना सुरू केली.

३. लष्करी स्टॅम्प (Military stamps) : लष्करी तिकिटे ही विशेष टपाल तिकिटे आहेत; जी युद्धाच्या वेळी किंवा शांतता राखण्याचे काम करणाऱ्या सैनिकांसाठी जारी केली जातात. सैनिकांना त्यांच्या प्रियजनांशी संवाद साधता यावा यासाठी आणि त्यांना संदेश देण्यासाठी या स्टॅम्पचा वारंवार वापर केला जातो.

आधीच्या काळात आवडत्या व्यक्तीला किंवा दूरवर असलेल्या अनेकांना स्वतःच्या भावना कळवण्यासाठी त्या सुंदर अक्षरांत एका कागदावर उतरवून पत्र लिहिले जायचे. पण, सध्याच्या काळात संवादासाठी मोबाईल, संगणक यांचा वापर केला जातो. हे खरे असले तरीही इंटरनेटच्या काळात आजही लोक टपाल सेवेचा वापर करतात आणि त्यावरचा लोकांचा विश्वास कायम आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the colour of post box red in india asp