पावसाळ्यात दरवर्षी मुंबईमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. मुंबईकरांसाठी हे चित्र काही नवीन नाही. पण मुंबईची अशी अवस्था का होते हा प्रश्न राहून राहून सर्वांना पडतो. मुंबईची तुंबई का होते? हे जाणून घेताना मागील भागात आपण जाणून घेतले की. मुंबईत येणाऱ्या पूराचा मिठी नदीशी काय आहे संबध आहे? २६ जुलैला आलेल्या पूरामागील खरे कारण काय होते? आता या भागात मुंबईची मुळ रचना या पूरस्थितीसाठी कशी कारणीभूत ठरते याबाबत जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईची तुंबई का होते?

थोड्याशा पावसानंतरही मुंबईत पाणी साठण्यामागे काही भूशास्त्रीय कारणे आहेत. मुंबईच्या भूगर्भात असलेल्या लाव्हारसाच्या थरांची रचना याला कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबईला बेट आणि बशीसारखा आकार प्राप्त झाला आहे. मुंबईच्या रचनेबाबत प्रसिद्ध भूगर्भतज्ज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉ. रेमंड दुरईस्वामी यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली होती. या माहितीनुसार, “मुंबईची रचना ही ज्वालामुखीच्या प्रचंड मोठ्या महाविस्फोटातून झाली आहे. या विस्फोटादरम्यान लाव्हारसाचे जुने थर खाली जात होते आणि नवीन थर वर तयार होत होते. मुंबईच्या भूरचनेत सात थर आहेत. लाव्हारस जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वर येतो तेव्हा तिथे आजूबाजूला असलेली मातीदेखील घेऊन येतो. लाव्हारसाचा एक वेगळा असा चिखल तयार होतो. हा जो चिखलाचा भाग आहे, त्याला शेल (Shell), असे म्हटले जाते. याच शेलमध्ये आपल्याला मुंबईतील प्राचीन जीवाश्म सापडले आहेत. मुंबईच्या रचनेमध्ये सात थर आहेत; ज्यामध्ये बसॉल्टच्या दोन थरांमध्ये एक शेलचा थर आहे. शेलचा गुणधर्म असा आहे की, ते पाणी पकडून ठेवते. पाणी खेचते, शोषते; पण ते बाहेर सोडत नाही. त्यामुळे शेलच्या थराच्या खालच्या बाजूला पाणी जात नाही.

तसेच हायलोक्लास्टाइट (Hyaloclastite) हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. एखाद्या तापलेल्या काचेवर पाणी टाकले, तर ती तडकते. त्याचप्रमाणे बसॉल्टदेखील अशाच प्रकारे तडकतो तेव्हा त्याचा हायलोक्लास्टाइट (Hyaloclastite) तयार होतो. त्यामुळे भेगा तयार होतात. मुंबईमध्ये जे पाणी साठते, ते या भेगांमधून खाली जाते आणि शेलच्या खडकांपर्यंत जाते. मुंबईमध्ये हे जे शेलचे खडक आहेत, ते २० मीटरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे मुंबईत थोडासा पाऊस पडला तरी मुंबईमध्ये पाणी साठून राहते आणि मुंबईची तुंबई होते.

हेही वाचा – दरवर्षी मुंबईची तुंबई का होते? मुंबईत येणाऱ्या पुराचा मिठी नदीशी काय आहे संबध? जाणून घ्या

मुंबईची तुंबई होण्यामागे आणखी दोन महत्त्वाची कारणे

मुंबईची तुंबई होण्यामागे आणखी दोन महत्त्वाची कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्वत: मुंबईकर. दुसरे म्हणजे महानगरपालिका आणि कंत्राटदार. नालेसफाई व्यवस्थित न होण्याला मुंबई महानगरपालिका आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. मुंबईतील नाले साफ करण्यासाठी कंत्राटे दिली जातात; पण नाले मात्र पूर्णपणे स्वच्छ होत नाहीl. पालिकेचा १०० टक्के नालेसफाईचा दावा खोडून काढण्याचे काम दरवर्षी मुंबईचा पाऊसच करतो.

नाल्यामध्ये वाहत येणाऱ्या फ्रिज, बेड, गाद्या यांसाठी निसर्ग नव्हे, तर मुंबईकर स्वत:च जबाबदार आहेत. २६ जुलैला आलेल्या पुराच्या वेळी हे लक्षात आले की, अनेक नाले हे प्लास्टिकने भरलेले आहेत. आपण जे प्लास्टिक वापरतो, ते आपण याच नाल्यांमध्ये टाकून देतो आणि याच नाल्यांमध्ये प्लास्टिक कुठेतरी जाऊन अडकते. साहजिकच मग पाण्याचा प्रवाह पुढे जाण्यासाठी वाव राहत नाही. २०२३ मध्ये अंधेरी पूर्व परिसर जलमय झाला होता. याचा शोध घेतल्यानंतर लक्षात आले की, अंधेरी पूर्व येथील मोगला नाल्यामध्ये फ्रिज, बेड, गाद्या वाहून आल्या होता आणि हे सर्व मुंबईकरांनीच नाल्यात टाकले होते. त्यामुळे मुंबईकरदेखील पूर येण्यासाठी तितकेच जबाबदार आहेत. सध्या मुंबईत माती दिसेल अशी जमीनच शिल्लक राहिलेली नाही. एक काळ असा होता जेव्हा मुंबईमध्ये मोठमोठी मैदाने अस्तित्वात होती. आता ती मैदाने दिसत नाहीत. कारण- या मैदानांवर वाहनांसाठी सिमेंटचे वाहन तळ उभारण्यात आले आणि माती दिसेनाशी झाली. पावसाळ्यात हे सिमेंट पाणी शोषून घेत नाही आणि पाणी साठून राहते.

हेही वाचा – Video : पुण्यातील रमणबागेचा आणि पेशवाईचा काय आहे संबंध? रमणबागेचा वापर नेमका कशासाठी होत असे?

मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून सुजाण नागरिक म्हणून आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळा आणि आहे त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करा. तसेच मोकळी जमीन असेल, तर त्यावर सिमेंट टाकून ती बंद करू नका.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why mumbai is flooded every time what is the connection between mumbais topography and flood situation who is responsible snk
Show comments