शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीप्रमाणे यंदादेखील मोठी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. शिरूरमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने शिंदे गटाकडून आयात केलेले उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी मंगळवारी मतदारसंघातील एका प्रचारसभेत बोलताना शिवाजीराव पाटलांवर शेलक्या शब्दात टीका केली. कोल्हे म्हणाले, समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती. मात्र, अनेक पक्षातून बेडूक उड्या मारून आलेल्या उमेदवारावर बोलणं योग्य नाही. शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मात्र तो प्लॅन नंतर रद्द झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल कोल्हे यांच्या या दाव्यावर छगन भुजबळ यानी आता प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी स्वतः तरी असं कधी कुठेही म्हणालो नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी माझ्या तोंडी अशा चुकीच्या बातम्या चालवू नये. मुळात मी कशाला शिरूरला जाईन? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी याबाबत चर्चा केली होती. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना दोष देणार नाही. ज्यावेळी नाशिक लोकसभेसाठी माझं नाव ठरलं होतं. नाशिकमध्ये मला उमेदवारी देण्याबाबत अंतिम निर्णय झाला होता. तेव्हा वरून वेगळे आदेश आले, दिल्लीत काही वेगळ्या घटना घडल्या आणि त्यानंतर ती जागा शिंदे गटाला दिली गेली… तसेच इतर गोष्टी घडल्या ज्या मी प्रसारमाध्यमांना आधीच सांगितल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांची अडचण झाली होती, कारण नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे खासदार आहेत, ती शिंदे गटाची जागा आहे. आमचाही त्या जागेसाठी आग्रह होता. त्यामुळे नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता.

हे ही वाचा >> “पप्पा भाजपात, मम्मी राष्ट्रवादीत, त्यामुळे मल्हार पाटलांचा…”, ओम राजेनिंबाळकरांचा टोला

छगन भुजबळ म्हणाले, अगदी चांगला विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला. ते मला म्हणाले शिरूरमध्ये ओबीसी समाजाचे, नाभिक समाजाचे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तुम्ही तिथून निवडणूक लढू शकता. यामागे त्यांचा खूप चांगला हेतू होता. मी तिथे गेलो असतो तर नाशिकचा तिढा देखील सुटला असता आणि हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका होती, जी चांगली होती. मात्र मी त्यांना सांगितलं की मला माहिती आहे तिकडे ओबीसी आहेत, पण ओबीसी तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत आणि मी सगळीकडे जातो, भाषण करतो. परंतु, माझा प्रामुख्याने संबंध हा नाशिकशी येतो. मी नाशिकमध्ये आमदार होतो, आहे, मी नाशिकचा पालकमंत्री आहे आणि इतर गोष्टी मी त्यांना सांगितल्या. तसेच मी त्यांना सांगितलं की मी नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. मुळात मी काही त्यांना मागितलंच नव्हतं. मला नाशिकमधून उमेदवारी मिळाली नाही तर कुठल्याही मतदारसंघातून उमेदवारी द्याच असा काही माझा आग्रह नव्हता. मला तिकीट हवच आणि तिकिटासाठी मी कुठेही जाईन असं मी कुठेही म्हटलं नव्हतं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal says cm eknath shinde asked me contest lok sabha from shirur to resolve the nashik rift asc