लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून नाराजीनाट्य रंगल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. काँग्रेसने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काँग्रेसला मुस्लीमांची मते तर हवी असतात, पण त्यांना उमेदवारी का नाही?”, असा प्रश्न उपस्थित करून नसीम खान यांनी आपली नाराजी उघड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबईतून तिकीट मिळविण्यासाठी नसीम खान प्रयत्नशील होते, मात्र याठिकाणी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते नाराज झाले.

नसीम खान यांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ते लोकसभा मतदानाचे जे टप्पे उरले आहेत, त्याच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. यासाठी नसीम खान यांनी दोन कारणे दिली आहेत. पहिले म्हणजे, महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे, राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की, काँग्रेस पक्ष तरी निदान एखाद्या मुस्लीम नेत्याला उमेदवारी देईल. पण दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही.

ताजी अपडेट

नसीम खान हे नाराज असल्यामुळे एमआयएम पक्षाने त्यांना लोकसभा लढविण्याचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. थोड्याच वेळात नसीम खान पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहेत. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना एमआयएमकडून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले जाते

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader naseem khan wrote letter to mallikarjuna kharge resign from campaign committee kvg
Show comments