Rohit Pawar On Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज (८ फेब्रुवारी) या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी पार पडत आहे. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्ष ४७ जगांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही तासांत निकाल स्पष्ट होणार आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे नेत व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांचाही पराभव झाला आहे. तसेच काँग्रेसला दिल्लीच्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत असतानाही दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यामुळे याचाही फटका काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला बसला असल्याचं आता बोललं जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडी असती तर भाजपा पक्ष २० जागांच्या पुढेही गेला नसता’, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

“दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपाचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपाच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती. परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत. परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांचा पराभव

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज (८ फेब्रुवारी) सुरु आहे. पुढील काही तासांत दिल्लीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.