लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती आली नसली तरीही आकडेवारीनुसार कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे याचा अंदाज लावता येत आहे. त्यानुसार, अजित पवार गटाला केवळ एकच जागा मिळाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांचा पराभव केलाय. परंतु, हा मतदारसंघ वगळता इतर तिन्ही मतदारसंघात अजित पवार गटाचा दारूण पराभव झाला आहे. अटीतटीच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो.”

हेही वाचा >> Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या अपयशामुळे कार्यकर्ते खचू नये याकरता अजित पवारांनी त्यांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.” असं म्हणत त्यांनी अजित पवार गटाच्या पुढील रणनीतीची माहिती दिली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे”, असं म्हणत त्यांनी सुनील तटकरेआणि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont get tired of failure take up public service with new hope ajit pawars appeal to workers after defeat in lok sabha sgk
Show comments