लोकसभा निवडणूक १ जून रोजी पार पडली. ही निवडणूक देशभरात सात टप्प्यांत घेण्यात आली होती. ४ जून रोजी निकालही लागले. त्यानंतर ९ जूनला केंद्रात सरकारही स्थापन झालं आहे. आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. यावर्षी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने आता निवडणूक आयोगाने महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक आयोगाने केलं महत्त्वाचं आवाहन

निवडणूक आयोगाने या निवडणुकांची तयारी म्हणून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत मतदार म्हणून तुमची नोंदणी केली नसेल तर ती तातडीने करुन घ्या असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

हे पण वाचा- लोकसभेतील पराभवानंतर महायुतीचा मोठा निर्णय, राज्य सरकारच्या ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पाला स्थगिती!

२५ जूनपासून काय केलं जाणार?

२५ जूनपासून म्हणजेच येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार आहे. पोलींग स्टेशन्स, मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे. असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच निवडणूक आयोगाने महत्त्वाची बाब नमूद केली आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटलंय?

१८ व्या लोकसभेसाठीची निवडणूक पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या ठिकाणी निवडणूक पूर्वतयारी सुरु केली आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाने राज्यांना केली आहे.

महाराष्ट्रातलं चित्र नेमकं काय?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा आणि महायुतीला मोठा फकटा बसला आहे. ४५ प्लसचा दावा करणाऱ्या महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. लोकसभेतल्या या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. लोकसभेत ज्याप्रमाणे लोकांनी भाजपाला नाकारलं तसंच चित्र विधानसभेतही दिसेल आणि आम्ही १८० ते १८५ जागा जिंकू असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. तर भाजपासह महायुतीनेही आम्ही चांगली कामगिरी करु असा दावा करत आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असं स्पष्ट केलं आहे. भाजपाने जी फोडाफोडी केली ती लोकांना म्हणजेच खास करुन मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना भावली नाही हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिलं आहे. आता विधानसभा जिंकायची असेल तर भाजपाची रणनिती नेमकी काय? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.