Raju Patil On EVM And Eknath Shinde : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला. तर प्रमुख प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. दरम्यान महायुतीच्या या लाटेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही फटका बसला. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह २०१९ मध्ये वियजी झालेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाला. या पराभवानंतर माजी आमदार राजू पाटील यांनी ईव्हीएमवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. याचबरोबर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजू पाटील ईव्हीएमबाबत काय म्हणाले?

यावेळी बोलताना माजी आमदार राजू पाटील म्हणाले, “जो निकाल लागला तो मी स्वीकारला आहे. पण, निकालानंतर ईव्हीएमबाबत जी बोंबाबोंब चालू आहे, तो मुद्दा आमच्या पक्षाने आणि राज ठाकरे यांनी २०१८ मध्येच उपस्थित केला होता. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. आता माझ्याच मतदारसंघाबाबत बोलायचे झाल्यास, इथे ६५ हजार मतदार वाढले आहेत आणि प्रतिस्पर्धी उमेदवार ६६ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. म्हणजे वाढलेल्या ६५ हजारांपेक्षा १ हजार जास्त मते विरोधी उमेदवाराला कशी मिळाली.”

भाजपा सांगेल तेच करावे लागणार…

ईव्हीएमबाबतच्या मुद्द्यावर बोलताना राजू पाटील यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले. शेवटी यांना भाजपा जे सांगेल तेच करावे लागणार आहे. पण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठीही अशा गोष्टी सरू आहेत का, अशी शंका येते.”

हे ही वाचा : “एका गृहमंत्री पदावरून सरकार अडलेलं नाही, तर…”, महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

विधानसभा निवडणुकीत कशी होती मनसेची कामगिरी?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकच जागा जिंकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभेसाठी जोरदार तयारी केली होती. यासाठी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभर दौरेही केले होते. त्यांनी यावेळी २८८ पैकी १२८ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. पण, यातील एकाही उमेदवाराला विजय मिळता आला नाही. पक्ष स्थापन झाल्यानंतर २००९ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रत्येकी एक आमदार विजयी झाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मनसेचे पाटी कोरीच राहिली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mns mla raju patil on evm and eknath shinde aam