शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. शिवसेना ठाकरे गटातील आक्रमक नेत्यांपैकी एक भास्कर जाधव आहेत. भास्कर जाधव यांची गुहागर विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. महाविकास आघाडीत गुहागरची जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता असून भास्कर जाधव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात.

भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. चिपळून विधानसभा मतदारसंघातून १९९५ व १९९९ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४ मध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यावेळी नाराज झालेल्या जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व २००४ मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा : Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

शिवसेना सोडल्यानंतर भास्कर जाधव यांनी वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून ते सलग दोन वेळा म्हणजेच २००९ व २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले. २०१९ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली. राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत जाधव यांचे संबंध ताणले जात होते, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत घरवापसी केल्याचे म्हटले जाते. सध्या भास्कर जाधव हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असून ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना ७४६२६ मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गुहागरमधून ४७०३० मते मिळाली. अनंत गितेंना २७५९६ मते अधिक मिळाली. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार भास्कर जाधव यांची चांगली पकड आहे.

हेही वाचा : Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?

२०१४ व २०१९ ची गुहागर विधानसभा निवडणूक

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. भाजपाचे उमेदवार डॉ. विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना ७२५२५ मते, तर भाजपाच्या डॉ. नातू यांना ३९७६१ व शिवसेनेच्या विजयकुमार भोसलेंना ३२०८३ मते मिळाली होती. भास्कर जाधव यांनी ३२००० हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.

२०१९ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवून जिंकली होती. या निवडणुकीत जाधव यांना ७८७४८ मते, तर राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांना ५२२९७ मते मिळाली होती.

महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार?

गुहागर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून विनय नातू उमेदवार असणार की, सदानंद चव्हाण याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

हेही वाचा : Supriya Sule On Mahayuti : “जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…”, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सुप्रिया सुळेंचा महायुतीला इशारा

भास्कर जाधव मुलासाठी मतदारसंघ सोडणार?

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०२४ ची विधानसभा निवडणूक पुत्र विक्रांत जाधव यांना गुहागर मधून लढवता यावी, यासाठी भास्कर जाधव यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुलाला गुहागरमधून तर स्वत: चिपळूण मधून निवडणूक लढवण्यासाठी भास्कर जाधव हे प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना साद देत एका मेळाव्याचेही आयोजन केले होते. तसेच दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

२००८ नंतर रायगड लोकसभेचा भाग

रायगड लोकसभेचा एक भाग असलेला गुहागर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना, भाजपचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. २००८ मध्ये लोकसभा मतदारसंघांची फेरमांडणी होण्याआधी गुहागर विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होता. फेरमांडणी झाल्यानंतर हा मतदारसंघ आता रायगड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात गुहागर, पेन, अलिबाग, श्रीवर्धन, महाड व दापोली हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

हेही वाचा : Achalpur Vidhan Sabha Constituency : बच्चू कडू यांची घोडदौड कायम रहाणार? महायुती-महाविकास आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान

हापूस आंबा, काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध

हापूस आंबा, काजू, सुपारी यांचे उत्पादन गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणात होते. दाभोळ वीज प्रकल्पानंतर गुहागरला आर्थिक चालना मिळाली. गुहागरमधील नारळ कोकणात प्रसिद्ध आहे. गुहागर हे दुर्गादेवी मंदिर व श्री व्याडेश्वर मंदिरामुळे देखील प्रसिद्ध आहे.