Harshvardhan Patil : जनतेचा आवाज एकच आहे मी निवडणूक लढवली पाहिजे. मी शरद पवारांना भेटलो त्यांनीही मला सांगितलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन. हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद घेईन. त्यानंतर निर्णय जाहीर करेन असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. तुम्ही सांगा राष्ट्रवादीत जायचं का? त्यावर उपस्थितांनी होय आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार ही घोषणाच त्यांनी केली आहे.

माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची सविस्तर चर्चा

मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. तसंच दोन महिने तुम्ही मांडलेली भूमिका या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे त्याविरोधात मला जाता येणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला तर तो व्यक्तिगत निर्णय होईल. त्यामुळे मला जनतेच्या प्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. असंही हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) म्हणाले.

लोकांच्या आग्रहामुळेच मी राजकीय भूमिका ठरवली

आपण निर्णय घ्यायचा आणि तो शरद पवारांना कळवायचा. त्यापुढचा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या विरोधात मी जाणार नाही. ज्यावेळी या तालुक्यात राजकीय निर्णय झाले आहेत ते जनतेच्या आग्रहामुळे झाले आहेत असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निर्णय झाले आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती आता होते आहे. १९९५ ला तुम्हीच आग्रह केला होता की बंडखोरी करा. त्यावेळी मी बंडखोरी केली. त्यावेळी जनतेच्या आग्रहामुळे आणि मतांमुळे मी निवडून आलो असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर तुम्ही म्हणालात काँग्रेसमध्ये जा की काँग्रेसमध्ये जा. त्यानंतर तुम्हीच आग्रह केलात म्हणून २०१९ ला भाजपात गेलो. दुर्दैवाने ती निवडणूक जिंकता जिंकता हरलो. इंदापूर तालुक्याला अपयश पहावं लागलं. मागच्या १० वर्षांत ज्या ज्या ठिकाणी राडे झाले, समाजांमध्ये तेढ निर्माण झाली हे आपण पाहतोय. असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांनी आज इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जावंच लागेल असंही हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) म्हणाले.