Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मतदान पार पडल्यानंतर आज (५ ऑक्टोबर) एक्झिट पोल समोर आले आहेत. आता ८ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकालही समोर येणार आहे. मात्र, त्याआधी आज एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, हरियाणात भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे, तर १० वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडिया टुडे-सीव्होटरच्या एक्झिट पोलनुसार, विधानसभेच्या ९० जागांपैकी काँग्रेसला ५०-५८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे, तर न्यूज २४ चाणाक्यच्या पोलनुसार, काँग्रेसला ५५ ते ६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊच्या पोलनुसार काँग्रेसला ५० ते ६४ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच इंडिया टीव्हीच्या पोलनुसार काँग्रेसला ५९ जागा मिळतील असा अंदाज आहे.

हेही वाचा : Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात भाजपाची हॅटट्रिक चुकणार; १० वर्षांनी काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता

‘आप’ला एकही जागा नाही?

हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने उमेदवार उभे केले होते. तसेच अरविंद केजरीवाल यांनी विविध ठिकाणी प्रचाराच्या सभाही घेतल्या. मात्र, समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला एकही जागा दाखवण्यात आलेली नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

वरील सर्वच एक्झिट पोलनुसार काँग्रेसला हरियाणात बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सत्ताधारी भाजपाची हॅटट्रिक चुकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज अनेकदा चुकीचेही ठरू शकतात. ही फक्त अंदाजित आकडेवारी आहे. त्यामुळे निकालानंतर कोणत्या पक्षाची किती जागा मिळतील, स्पष्ट होईल. यामधील आकडेवारीमध्येही बदल होऊ शकतात. दरम्यान, असं असलं तरी हरियाणात काँग्रेस आणि भाजपामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे ठरले यावर एक नजर टाकूयात.

निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरले?

हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांच्या अग्निवीर योजना, राज्यातील बेरोजगारी आणि पैलवानांचा मुद्दा या विषयांवरून काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे हे मुद्दे काँग्रेससाठी महत्वाचे ठरले. तर भाजपासाठी अडचणीचे ठरले. हरियाणा एक प्रमुख कृषी राज्य आणि भौगोलिकदृष्ट्या राजधानी नवी दिल्लीच्या जवळ असल्यामुळे महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजपाला अनेकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोर जावं लागल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे हे मुद्दे भाजपासाठी अडचणीचे ठरल्याचंही बोललं जात आहे. मात्र, असं असलं तरी निकालानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.