Lok Sabha Post Election survey: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भाजपा आणि घटक पक्षांना अपेक्षित असलेला निकाल लागला नाही. त्यामुळेच भाजपाची राष्ट्रीय पातळीवरची खासदारांची संख्या मोठ्या फरकाने कमी झाली. एप्रिल ते जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ १७ जागा जिंकता आल्या. त्यातही भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्या. तर काँग्रेसने एका जागेवरून १३ जागांवर मजल मारली. आज जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज इंडिया टुडेच्या ‘मुड ऑफ द नेशन’ या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

इंडिया टुडेने या सर्व्हेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपाला आणखी तीन जागांचा फायदा होऊ शकतो. त्यांची संख्या १२ वर पोहोचेल. तर काँग्रेसलाही आणखी तीन जागा मिळू शकतात, त्यामुळे त्यांचीही खासदारांची संख्या १६ वर पोहचू शकते.

हे वाचा >> Lok Sabha Election survey: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर काँग्रेसचा आकडा शंभरीपार, तर एनडीए…; काय सांगतो देशातील मतदारांचा कल?

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा सर्व्हे घेण्यात आला होता. महाराष्ट्रात काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सर्व्हेच्या माध्यमातून मतदारांचा कल काय आहे? हे या सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेण्यात आले.

जून महिन्यात अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसल्याचे निकालातून दिसून आले. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये भाजपा ९, शिवसेना शिंदे गट ७ आणि अजित पवार गटाला केवळ १ जागा जिंकता आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. तर एक अपक्ष खासदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने तब्बल १३, शिवसेना उबाठा गटाने ९ आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ८ जागा जिंकल्या.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ११ टक्के लोकांनी विरोधकांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तर २१ टक्के लोकांना काही प्रमाणात विरोधकांची कामगिरी आवडली. मात्र ३० टक्के लोक विरोधकांच्या आघाडीवर समाधानी नाहीत.

सर्व्हे कधी झाला?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सीव्होटर संस्थेने १५ जुलै २०२४ ते १० ऑगस्ट २०२४ दरम्यान सर्व्हे केला. देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील ४०,५९१ लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे मत जाणून घेण्यात आले. त्याचबरोबर सीव्होटरच्या साप्ताहिक मुलाखतींचाही आधार घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील संख्याबळ किती?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ५४३ जागांवर एनडीएने २९३ ठिकाणी विजय मिळविला. तर विरोधी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. एक्झिट पोल आणि इतर अंदाजांना यंदाच्या निकालाने साफ खोटे ठरविले. काँग्रेसने २०१९ च्या तुलनेत चांगली कामगिरी करत आपल्या खासदारांची संख्या ५२ वरून ९९ वर नेली. तब्बल एक दशकानंतर काँग्रेसमुळे लोकसभेला विरोधी पक्षनेता लाभला.

भाजपाने निवडणुकीपूर्वी स्वतःला ३७० जागा आणि मित्रपक्षांना ३० जागा अशा एकूण ४०० जागा जिंकण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यासाठी “अब की बार ४०० पार”, अशी घोषणाही देण्यात आली. मात्र भाजपाला केवळ २४० जागा मिळाल्या. तर २०१९ च्या तुलनेत त्यांना ६३ जागांचे नुकसान झाले.

आता भाजपाला किती जागा मिळतील?

आता जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपाला चार जागांचा लाभ होईल, असे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेसला अधिक फायदा होणार असून आज निवडणुका झाल्यास त्यांची संख्या १०६ वर पोहोचू शकते, असे या सर्व्हेद्वारे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१४ साली काँग्रेसकडे केवळ ४४ तर २०१९ साली फक्त ५२ जागा होत्या.