Lok Sabha Post Election survey: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीने अनपेक्षितपणे उसळी घेतली आणि भाजपाला स्वतःच्या बळावर बहुमताची संख्या गाठण्यापासून रोखले. २०१४ आणि २०१९ नंतर खऱ्या अर्थाने यावेळी एनडीएचे सरकार स्थापन झाले. जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर चित्र काय असेल? कोणत्या आघाडीला अधिक फायदा होईल? भाजपा स्वबळावर बहुमत गाठेल का? इंडिया आघाडीची कामगिरी कशी राहील, याचा आढावा इंडिया टुडे वृत्तसंस्थेच्या मुड ऑफ द नेशन सर्व्हेद्वारे घेण्यात आला आहे. या सर्व्हेतून आलेले निष्कर्ष काय आहेत? ते पाहू.

आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर एनडीएला सहा जागांचा आणखी फायदा होईल आणि त्यांची संख्या २९३ वरून २९९ वर पोहोचेल, असा अंदाज या सर्व्हेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीची गोळाबेरीज तशीच राहणार असून त्यांना केवळ एका जागेचे नुकसान होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. मात्र काँग्रेसच्या जागा १०० हून अधिक वाढतील, असेही सांगण्यात येत आहे.

हे वाचा >> ‘लोकसभेच्या निवडणूक निकालाने काँग्रेसला काय दिलं?’ वाचा लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात सरस कोण?

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी यांच्यापैकी कोण योग्य दावेदार आहे? असाही प्रश्न या सर्व्हेद्वारे विचारण्यात आला. ज्यामध्ये आश्चर्यकारक निकाल इंडिया टुडेच्या हाती आल्याचे समजते. पुढचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात ४९ टक्के लोकांनी आपले मत टाकले आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्याबाजूने २२.४ टक्के लोकांनी आपले मत दिले आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये जेव्हा मूड ऑफ द नेशनचा सर्व्हे करण्यात आला होता, त्यापेक्षा आता सहा टक्क्यांनी पंतप्रधान मोदींची प्रसिद्धी कमी झाली आहे. तर राहुल गांधी यांच्या प्रसिद्धीत आता आठ टक्क्यांची वाढ झाल्याचे इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

सर्व्हे कधी झाला?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सीव्होटर संस्थेने १५ जुलै २०२४ ते १० ऑगस्ट २०२४ दरम्यान सर्व्हे केला. देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील ४०,५९१ लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे मत जाणून घेण्यात आले. त्याचबरोबर सीव्होटरच्या साप्ताहिक मुलाखतींचाही आधार घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

हे ही वाचा >> Lok Sabha Election Result 2024: वाराणसी ते वायनाड, देशातील लक्षवेधी लढती

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील संख्याबळ किती?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ५४३ जागांवर एनडीएने २९३ ठिकाणी विजय मिळविला. तर विरोधी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. एक्झिट पोल आणि इतर अंदाजांना यंदाच्या निकालाने साफ खोटे ठरविले. काँग्रेसने २०१९ च्या तुलनेत चांगली कामगिरी करत आपल्या खासदारांची संख्या ५२ वरून ९९ वर नेली. तब्बल एक दशकानंतर काँग्रेसमुळे लोकसभेला विरोधी पक्षनेता लाभला.

भाजपाने निवडणुकीपूर्वी स्वतःला ३७० जागा आणि मित्रपक्षांना ३० जागा अशा एकूण ४०० जागा जिंकण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यासाठी “अब की बार ४०० पार”, अशी घोषणाही देण्यात आली. मात्र भाजपाला केवळ २४० जागा मिळाल्या. तर २०१९ च्या तुलनेत त्यांना ६३ जागांचे नुकसान झाले.

आता भाजपाला किती जागा मिळतील?

आता जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपाला चार जागांचा लाभ होईल, असे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेसला अधिक फायदा होणार असून आज निवडणुका झाल्यास त्यांची संख्या १०६ वर पोहोचू शकते, असे या सर्व्हेद्वारे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१४ साली काँग्रेसकडे केवळ ४४ तर २०१९ साली फक्त ५२ जागा होत्या.