Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक राज्यात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी प्रचार सभा घेतल्या. विजयपुरा येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी भाजपावर हल्लाबोल करीत कर्नाटकमधील भाजपा सरकार हे देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले. प्रत्येक कामात ४० टक्के कमिशन घेतले, असा आरोपही त्यांनी लावला. कंत्राटदारांनी केलेल्या तक्रारीचा हवाला देताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा सरकारने सरकारी कंत्राटे देत असताना ४० टक्के कमिशनची मागणी केली. त्यामुळे ४० टक्के मागणाऱ्या भाजपाला आगामी निवडणुकीत कर्नाटक विधानसभेतील २२४ जागांपैकी केवळ ४० जागा मिळतील तर काँग्रेस १५० जागांवर विजय मिळवील, असे भाकीत गांधी यांनी वर्तविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कंत्राटदारांकडून कमिशन स्वरूपात मिळालेल्या पैशातूनच भाजपाने आधीच्या सरकारमधील आमदार पळविले. भाजपाकडून कशा पद्धतीने आमदार विकत घेतले जातात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना सांगावे,” अशीही टीका राहुल गांधी यांनी केली. कर्नाटकप्रमाणेच भाजपाने मध्य प्रदेशमधील आमदार विकत घेतले, गोवा आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांत हाच कित्ता गिरवला. ४० टक्के कमिशनमधून आलेला पैसा आमदार विकत घेण्यासाठी देशभरात वापरण्यात आला, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर नेते बसवण्णा यांच्याबाबत भरभरून बोलले. पण त्यांच्या विचारांना भाजपा आचरणात आणत नाही. लिंगायत पंथाचे आदरस्थान आणि १२ व्या शतकात समाजक्रांती करणारे महापुरुष बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी भाजपाला लक्ष्य करण्याची संधी साधली. बसवण्णा यांनी आपल्याला लोकशाहीचा विचार दिला, आपण तो जपला पाहिजे. आपले संविधान, संसद आणि लोकशाही ही बसवण्णा यांच्या विचारांप्रमाणेच आहे. आपण ती जपली पाहिजे.”

हे वाचा >> राहुल गांधींनी विचारलं “आई आता कुठे जायचं?”, सोनिया गांधी म्हणाल्या…, सरकारी बंगला सोडल्यानंतर काँग्रेसने शेअर केला भावूक VIDEO

“बसवण्णा म्हणाले, घाबरू नका, सत्य कथन करा. आज आपण पाहतोय की, भाजपा आणि संघाची विचारधारा देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवीत आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाचे लोक फक्त बसवण्णाचे नाव घेतात, पण त्यांच्या विचारांना आपले मानत नाहीत,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला.

अदाणी प्रकरणावरून पुन्हा एकदा टीका

“बसवण्णा यांनी समाजातील गरीब, वंचितांना मदत करावी, असा संदेश दिला. त्यांनी अब्जाधीशांची मदत करा, असे सांगितले नाही. मी बसवण्णा यांचे विचार वाचले आहेत. देशाची संपत्ती अदाणीला देऊन टाका, असे कुठेही बसवण्णांनी म्हटलेले नाही. मी संसदेतही बोललो. पंतप्रधान आणि अदाणी यांचा संबंध काय, असा प्रश्न विचारला. देशाची सर्व संपत्ती, बंदरे आणि विमानतळ अदाणीला का देण्यात येत आहेत. अखेर तुमचे आणि त्यांचे संबंध काय?”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदाणी प्रकरणावरून भाजपावर टीका केली.

राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदाणी प्रकरणावरून मोदी सरकारला जाब विचारला. ज्याची परिणती नंतर एका जुन्या प्रकरणात त्यांची खासदारकी रद्द होण्यात झाली. लोकसभेत अदाणी विषयावर बोलत असताना माझा माइक बंद करण्यात आला आणि मला अपात्र ठरविण्यात आले. त्यांना वाटते की फक्त लोकसभेतच सत्य बोलण्यापासून ते मला रोखू शकतात. पण सत्य कुठेही बोलू शकतो, आज या सभेतही तेच बोलत आहे, असेही गांधी यांनी स्पष्ट करीत भाजपाला पुन्हा आव्हान दिले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election congress will bag 150 seats and corrupt bjp govt will get only 40 seats says rahul gandhi kvg