लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. एनडीएला बहुमत मिळालं असलं तरीही इंडिया आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. भारतातील जनतेने मोदींच्या विरोधात कौल दिला असल्याचं इंडिया आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बहुमत सिद्ध करण्याकरता जुळवाजुळ सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

“आम्ही राष्ट्रपती भवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहोत”, असं संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मोदींना शपथ घेऊद्या. पण नंतर खेळ सुरू होईल. हे सरकार चालणार नाही. आम्हाला तर वाटतं मोदींनी शपथ घ्यावी. ८ तारखेला नाही तर आज रात्रीच शपथ घ्यावी, त्यांच्यावतीने आम्ही पेढे वाटू.”

हेही वाचा >> विरोधात बसणार की सत्तेत येणार? इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले…

“चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो. ते फक्त भाजपाचेच नाही, तर ते सर्व पक्षांचे आहेत. त्यांनी काँग्रेस आणि भाजपाबरोबर काम केलं आहे. मोदींना आघाडी चालवण्याचा किती अनुभव आहे? मोदींचा हम करे सो कायदा आहे. या आघाडीत व्यक्तिमत्त्व किती फिट बसतात हे पाहावं लागेल”, असं म्हणत त्यांनी एनडीएवरही टीका केली.

दरम्यान, इंडिया आघाडीकडूनही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. परंतु, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही योग्य ती पावलं उचलू असं मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर म्हणाले होते. त्यामुळे ही नेमकी योग्य वेळ कोणती याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जनतेने मोदींविरोधात मतदान केल्याने जनतेच्या मनाप्रमाणे सरकार स्थापन केलं जाईल, असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. परंतु, बहुमतासाठी इंडिया आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. बहुमतासाठी त्यांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीकडे हे जुने मित्र पक्ष येतील का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीची नेमकी स्ट्रॅटेजी काय? याकडेच राजकीय वर्तुळात सर्वांचं लक्ष आहे.

भाजपा बहुमतापासून किती दूर?

लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागा मिळवता आल्या आहेत. बहुमतासाठी आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेशमध्ये १६ खासदार निवडून आले आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये १२ खासदार निवडून आले आहेत. भाजपाचा आणखी एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे ५ खासदार निवडून आले आहेत. या तीनही पक्षांनी भाजपाला साथ दिली तर भाजपा सहज सत्ता स्थापन करू शकते.

इंडिया आघाडीचं बलाबल किती?

इंडिया आघाडीकडे सध्या २३४ जागा आहेत. त्यांना सत्तास्थापनेसाठी ३८ जागांची गरज आहे. अपक्ष १८ खासदार आहेत. त्यामुळे टीडीपीचे १६ खासदार आणि इंडिया आघाडीची मोट बांधलेले नितीश कुमारांचे १२ खासदार इंडिया आघाडीबरोबर आले तर, इंडिया आघाडीला सहज सत्ता स्थापन करता येईल. परंतु, टीडीपीचे चंद्राबाबू आणि मध्य प्रदेशच्या नितीश कुमारांनी आधीच एनडीएला समर्थन दिल्याने ते पुन्हा इंडिया आघाडीत परतण्याची शक्यता फार कमी आहे.